एचसीएल कंपनीचे बिल थांबवा
By Admin | Updated: December 21, 2014 00:11 IST2014-12-20T23:54:34+5:302014-12-21T00:11:52+5:30
महापालिका सभेत निर्णय : पैशाचा हिशेबच नाही; अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक

एचसीएल कंपनीचे बिल थांबवा
कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला.
दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक
घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली.
एचसीएल कंपनी करारातील अटींप्रमाणे काम करीत नाही. सर्व यंत्रणा पाच वर्षांत अपडेट करायची होती; परंतु ती त्यांनी केलेली नाही. यंत्रणा अपडेट नसल्याचा फटका नागरिक आणि महापालिकेला बसत आहे. कंपनीला दिलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या बिलावर सेंट्रल आॅडिट रिपोर्टमध्ये आक्षेप घेतले आहेत. कंपनीने ताळेबंद सादर केलेला नाही. तसेच कंपनीला किती पैसे दिले याचा हिशेब पालिकेकडे नाही. कंपनी आपले काम शंभर टक्के करीत नाही याकडे महेश कदम यांनी लक्ष वेधले. संबंधित विषयाला उत्तर द्यायला जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने प्रभारी आयुक्त देसाई यांनी पुढील सभेत याबाबत माहिती देतो, असे सांगितले; परंतु त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही.
निशिकांत मेथे, मुरलीधर जाधव यांनी या कंपनीला कोणी अधिकारी सामील आहेत का, अशी शंका उपस्थित केली. जर कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत नसेल तर
त्यांचे बिल देण्याचे थांबवा, अशी मागणी संभाजी जाधव यांनी केली. त्यावेळी प्रभारी आयुक्त देसाई व उपायुक्त विजय खोराटे यांनी कंपनीची बिले थांबविण्याची ग्वाही सभागृहाला दिली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर सभागृहात चर्चा झाली. प्रशासन जाणीवपूर्वक पदोन्नती डावलत आहे. यामागे कोणाचा अहंकार नडला आहे का, अशी विचारणा राजू लाटकर यांनी
केली. २६ वर्षे पदोन्नतीपासून कर्मचारी वंचित राहत असतील तर ती प्रशासनाची चूक असल्याचे लाटकर म्हणाले. पदोन्नतीच्या मुद्द्यावर प्रशासनातील एक टोळके विद्वत्ता असलेल्यांना पुढे जाऊ देत नाही, असा टोला भूपाल शेटे यांनी हाणला. (प्रतिनिधी)