दलित वस्ती सुधारणा योजना निधी तातडीने थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:28+5:302021-04-28T04:24:28+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारमार्फत मिळालेला दलित वस्ती सुधारणा योजनेतील निधी चुकीच्या पध्दतीने खर्च करण्यात येत असल्याने हा निधी सोडू ...

दलित वस्ती सुधारणा योजना निधी तातडीने थांबवा
कोल्हापूर : राज्य सरकारमार्फत मिळालेला दलित वस्ती सुधारणा योजनेतील निधी चुकीच्या पध्दतीने खर्च करण्यात येत असल्याने हा निधी सोडू नये, तो तात्काळ थांबवावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना केली.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून प्रभाग आरक्षणदेखील टाकले आहेत. सध्या शहरातील ज्या अकरा प्रभागावर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले आहे, त्या प्रभागाना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाने खर्च करायचे ठरविले आहे. निवडणूक नियमावलीनुसार जरी अकरा प्रभागावर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले असले तरी, अशा प्रभागात दलित वस्ती फारच कमी आहे. त्यामुळे ज्या हेतूने राज्य सरकारने निधी दिला आहे, तो हेतू साध्य होत नाही. दलित वस्तीतूनच हा निधी खर्च झाला पाहिजे, असा जीआर आहे. मग दलित वस्ती सोडून जर दुसरीकडे निधी गेला असेल, तर तात्काळ तो थांबवावा, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षण पडलेल्या अकरा प्रभागांना प्रत्येकी एक कोटींचा निधी दिली आहे. त्याचे एस्टिमेट व कामांची मंजुरी सुध्दा झाली आहे. कामे सुरू होण्याची शक्यता आहे. आता अशा टप्प्यावर हा निधी थांबविण्याची मागणी क्षीरसागर यांनी केल्याने त्याला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.