दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक बंद
By Admin | Updated: December 19, 2014 23:53 IST2014-12-19T21:52:30+5:302014-12-19T23:53:16+5:30
ट्रकमालकांची तक्रार : हिंडाल्को कंपनी आणि कामगार वादाचा चारशे ट्रकना फटका

दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक बंद
सरवडे : दुर्गमानवाड (ता.राधानगरी) येथील हिंडाल्को कंपनी आणि कामगार यांच्यातील वादाचा फटका चारशे ट्रकमालकांना बसत आहे. त्यामुळे दररोज किमान एकतरी बॉक्साईट ट्रीप बसावी यासाठी असोसिएशनच्यावतीने बॉक्साईट वाहतूक बंद केली आहे. तर ट्रान्स्पोर्टचालकांनी सोमवारपासून बॉक्साईट भरण्यासाठी ट्रक पाठवण्याची तयारी केल्याने ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालक वाद चिघळला आहे.
दुर्गमानवाड येथून बेळगावला १ जानेवारी १९९४ पासून बॉक्साईट वाहतूक सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कंपनीला लोकप्रतिनिधी, संघटना, अनेक गावांच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. तर न्यायालयीन लढाही झाला. त्यानंतर कंपनीने लोकप्रतिनिधींसह, पत्रकार, संघटना, पक्ष, अधिकारी यांना ट्रकचा कोठा दिला. त्यामुळे संघर्षाची धार बोथट झाली आणि बॉक्साईट वाहतूक जोमाने सुरू झाली.
यावर्षी १७० ट्रान्स्पोर्टच्या नावाने ४०० ट्रकच्या साहाय्याने बॉक्साईट वाहतूक सुरू होते. पूर्वी ओव्हरलोड माल भरला जात होता. मात्र, अलीकडे अतिरिक्तमाल नेण्याचे बंद असून, प्रत्येक ट्रक दहा टनच माल भरतो. सध्या कंपनीचा दर प्रतिटन ७३१ रुपये असा आहे.
कंपनीच्या मशीनवर काम करणाऱ्या २० कामगारांना पगारवाढ हवी आहे. त्या वादातून ट्रक भरण्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत. तर आठ तासांची पाळी असल्याने सुमारे शंभर ट्रकच भरतात. त्यामुळे सध्या दोन-तीन दिवसानंतर ट्रीप मिळत आहे. पर्यायाने ट्रकमालकांना तोटा सहन करावा लागत असल्याने ट्रकमालक असोसिएशनच्यावतीने बॉक्साईट वाहतूक काही दिवसांपासून बंद आहे, असे असो.चे अध्यक्ष बाळासाहेब किरुळकर यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीने कर्मचारी व ट्रकमालकांच्या न्याय मागणीचा विचार न करता व उलट ट्रान्स्पोर्टस् चालकांना कंपनीकडे नोंद केलेले वाहन बॉक्साईट भरण्यास पाठवावे, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालक वाद चिघळत आहे. (वार्ताहर)