दगडफेक, तोडफोडीने तणाव

By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T01:08:32+5:302014-06-09T01:13:11+5:30

आक्षेपार्ह छायाचित्राचे पडसाद : रिपाइं कार्यकर्त्यांची कोल्हापूरसह जिल्ह्यात निषेध रॅली; रास्ता रोको

Stonewalling, Tension Stress | दगडफेक, तोडफोडीने तणाव

दगडफेक, तोडफोडीने तणाव

कोल्हापूर : माथेफिरूकडून काल, शनिवारी रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकण्याच्या घटनेचे पडसाद आज रविवारी दिवसभर कोल्हापुरात उमटले. प्रतिमा विटंबनेच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी शहरात निषेध रॅली काढून बंदचे आवाहन केले. यावेळी विटंबना करणाऱ्या माथेफिरू आरोपीस अटक झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत त्यांनी कोल्हापुरातील व्यापार, दुकाने बंद पाडली. यामुळे शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, स्टेशन रोडवर संतप्त जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करीत पोलीस जीप, चार केएमटी बस, बेकरी, हॉटेल, पेट्रोल पंप, एटीएम सेंटर, हातगाड्या, हारफुलांच्या टपऱ्यांवर तुफान दगडफेक करीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केले. या गोंधळामुळे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस बंदोबस्त तैनात करीत जमावावर नियंत्रण ठेवले.
डॉ. आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर शनिवारी रात्री टाकण्याचा प्रकार घडल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. दुपारी बाराच्या सुमारास आरपीआय आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशे कार्यकर्ते कावळा नाका येथील ताराराणी पुतळा चौकात जमा झाले. याठिकाणी घटनेचा निषेध करीत सुमारे अर्धा तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने चारही बाजंूची वाहतूक ठप्प झाली. यावेळी प्रवाशांना घेऊन आंदोलनातून मार्ग काढत जाणाऱ्या कर्नाटकातील दोन एसटी बसेसवर कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या. एसटी बसमधील प्रवासी बिथरून खाली उतरले. दगडफेकीमुळे वातावरण तणावग्रस्त बनले. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते मध्यवर्ती बसस्थानकमार्गे, दसरा चौकातून बिंदू चौकात आले.
या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास प्रा. कांबळे यांनी पुष्पहार घालून निषेध सभा घेतली. यावेळी विटंबना करणाऱ्या माथेफिरूला त्वरीत अटक करून त्याला फाशी द्या, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली .तसेच येत्या दोन दिवसांत आंदोलन व्यापक करणार असल्याचे यावेळी उत्तम कांबळे यांनी सांगितले.
रॅलीमध्ये दिलीप कांबळे, नागेश फराडे, दुर्वास कदम, अविनाश कुंडे, विश्वास देशमुख, समीर नदाफ, बाळासाहेब वाशीकर, बैजू कांबळे, अविनाश अंबपकर, सुखदेव बुदिहाळकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बसस्थानक परिसरात तोडफोड
कावळा नाक्याकडून मध्यवर्ती बसस्थानकमार्गे कार्यकर्ते बंदची हाक देत जात असताना बसस्थानक समोरील बेकरी सुरू होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बेकरीवर दगडफेक करून काचा फोडल्या. यावेळी शाहूपुरीच्या पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी बसस्थानकासमोरील केएमटी बस, फळविक्रेत्यांच्या हातगाड्या उलथवून टाकल्या. शाहूपुरीच्या पोलीस जीपवर दगड घालून समोरील काच फोडली. यावेळी पोलिसांनी गणेश कांबळे (रा. राजेंद्रनगर) या कार्यकर्त्याला ताब्यात घेत रस्त्यावरच पोलिसी खाक्या दाखवित शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणून बसविले. या गोंधळामुळे बसस्थानक परिसरात गोंधळ उडाला. प्रवासी भीतीने सैरावैरा वाट दिसेल तिकडे पळत सुटले. त्यानंतर हा जमाव घोषणा देत शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरून व्हीनस कॉर्नर चौकात आला. याठिकाणी सुरू असलेली दुकाने त्यांनी बंद करण्यास सांगितली. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गणेश कांबळे या कार्यकर्त्याला सोडून देण्यासाठी रस्त्यावरच ठाण मांडत घोषणाबाजी सुरू केली. अखेर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यातून आणून कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत दसरा चौक मार्गे बिंदू चौकात आले. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निषेध सभा घेतली.
पर्यटकांसह प्रवाशांचे हाल
सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. दुपारी बाराच्या सुमारास आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंदची हाक देऊ लागल्याने नेमका काय प्रकार आहे, हे व्यापाऱ्यांसह प्रवासी व पर्यटकांना समजेना. केएमटी बसेसवर दगडफेक झाल्याने शहरात गोंधळ उडाला. पटापट भीतीने सर्व दुकाने बंद झाली. केएमटी बसेस जाग्यावरच थांबविण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व एसटी बसेस मार्गस्थ न करता त्या जाग्यावरच थांबवून ठेवण्यात आल्या. ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयांचेही शटर डाऊन करण्यात आले. वडाप वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षासह रिक्षा बंद झाल्या. सर्व व्यवहार अचानक ठप्प झाल्याने प्रवासी वर्गाचे हाल झाले. तर रविवारचा दिवस असल्याने ‘महालक्ष्मी’च्या दर्शनासाठी पर्यटकांची शहरात सकाळपासून गर्दी होती. रास्ता रोकोसह वाहने, दुकाने बंद झाल्याने पर्यटकांची डोकेदुखी झाली. सुमारे चार-पाच तास सर्वांना आहे त्या जाग्यावरच बसून राहावे लागले.
पोलिसांची संयमी भूमिका
आठ दिवसांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर निषेध रॅलीदरम्यान वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, धन्यकुमार गोडसे, दिनकर मोहिते यांनी कावळा नाका ते बिंदू चौक मार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची एक तुकडी बिंदू चौकात तळ ठोकून होती. पोलिसांची तयारी पाहून कार्यकर्ते घोषणाबाजी करीत निघून गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Stonewalling, Tension Stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.