सोमय्या यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केले टप्पे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:44+5:302021-09-21T04:27:44+5:30
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात प्रवेश होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने विविध टप्प्यांवर नियोजनबध्द आखणी ...

सोमय्या यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केले टप्पे
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात प्रवेश होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने विविध टप्प्यांवर नियोजनबध्द आखणी केली. प्रत्येक टप्प्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांकडे जबाबदारी दिली; पण सातारा ते कऱ्हाड या सुमारे पाऊणतासाच्या रेल्वे प्रवासात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमय्या यांचे मनपरिवर्तन केले. त्यामुळे ते कोल्हापुरात न येता कऱ्हाडमध्येच उतरले.
सोमय्या रेल्वेत बसल्यानंतर त्यांना मिरज अथवा जयसिंगपूर रेल्वेस्थानकावर ताब्यात घेणार, असेच सर्वांना गाफील ठेवून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना सातारा येथे पाठवले. तेथून पुढे कऱ्हाडपर्यंतच्या पाऊण तासाच्या रेल्वेप्रवासात काकडे यांनी सोमय्या यांना जिल्हाप्रवेश बंदी आदेश, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्याची स्थिती समजावून सांगितली. ती मान्य केल्याने ते कऱ्हाड येथेच उतरले. कऱ्हाडहून पुढे आले असते, तर जयसिंगपूरमध्ये त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यावर सोपवली होती. पण ती वेळच आली नाही. अन् पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नि:श्वास सोडला.
दोन बंदी आदेश, पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात प्रवेश करण्यास सोमय्या यांना बंदी आदेश काढला, तसा जिल्ह्यात कार्यकर्ते एकत्र जमू नये, वाद करू नये यासाठी कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश काढून कार्यकर्त्यांनाही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून कागल येथे ७०० हून अधिक, मुरगूड येथेही ५०० हून अधिक, तर गडहिंग्लज, जयसिंगपूर, किणी टोल नाका, इचलकरंजीसह कोल्हापूर शहरातही पोलीस फौजफाटा तैनात होता. त्यामुळे रेल्वेने अगर मोटारीनेही सोमय्या कोल्हापुरात येऊ नये, याचे नियोजन केले होते.