वाडेंना पायघड्या; हाळवणकर वाऱ्यावर जिल्ह्यातून हद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:47+5:302021-01-08T05:16:47+5:30
इचलकरंजीतील दोघांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र ...

वाडेंना पायघड्या; हाळवणकर वाऱ्यावर जिल्ह्यातून हद्द
इचलकरंजीतील दोघांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाडे भेटीनंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातून विद्यार्थिदशेपासून भाजपसोबत निष्ठावंत असलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्षाकडून वाऱ्यावर सोडले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे हाळवणकरांना आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच आमदार प्रकाश आवाडे निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अग्रसेन भवन येथे मेळावा घेऊन सारवासारव करण्यात आली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी ‘‘घोडा गिळल्याची कथा’’ सांगून तो घोडा पोटातून बाहेर काढण्यासाठी मी आलो असल्याचे स्पष्ट केले होते, परंतु त्यावेळची चर्चाच सत्यात उतरली आणि आवाडे यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंब्याचे पत्र दिले.
या घडामोडींनंतरही हाळवणकरांच्या कार्यकर्त्यांची समझोता एक्स्प्रेस थोड्याफार प्रमाणात सुरळीत चाललेली ती गाडी आता घसरू लागली आहे. फडणवीस यांनी इचलकरंजीत येऊन आमदार आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आवाडे यांच्या अधिकृत प्रवेशाबाबत तांत्रिक अडचण असल्याचे बोलून दाखविले होते. ही तांत्रिक अडचण म्हणजे हाळवणकर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत जोर धरली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी हाळवणकर यांच्या घरीही भेट दिली, परंतु कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या पोटातून ‘‘घोडा’’ बाहेर काढणारे चंद्रकांत पाटील हेही होते. त्यांनी देखील खूप वेळ झाला असल्याचे सांगून बोलणे टाळले. या संपूर्ण घडामोडींमुळे हाळवणकरांना पक्षातून डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
चौकट
आवाडेंना दोन्ही पक्षांत मागणी
आमदार प्रकाश आवाडे यांची राजकीय कारकीर्द, अनुभव व पकड यामुळे कॉँग्रेसमध्ये परत आणण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांच्याकडे सोपविल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना दोन्ही पक्षांत घेण्यासाठी पायघड्या घालून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांतही उत्साही वातावरण आहे.