राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:05+5:302021-04-13T04:24:05+5:30
कागल : राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व ...

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा
कागल : राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांच्यातून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय याबाबत संभ्रमावस्था आहे. सरकारने व्यापाऱ्यांना नियम, अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल. राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा, आपण स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली.
मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी श्री घाटगे यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी चर्चा करताना श्री. घाटगे म्हणाले, लॉकडाऊन शक्यतेमुळे शेतकऱ्यांबरोबर कामगार, शेतमजूर, छोटे उद्योजक, कारागीर, बारा बलुतेदार व राज्यातील हातावर पोट भरणारा कामगार वर्ग, झोपडपट्टीमध्ये राहणारी जनता, कलावंत हातावर पोट असणारा वर्ग आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर काय करायचं या चिंतेत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन ऐवजी इतर उपाययोजना वाढवून कोरोना प्रतिबंधाचे काम करावे अन्यथा लॉकडाऊन काळात या वर्गाला आर्थिक सहकार्य करावे,. सध्या परिस्थिती गंभीर बनली असून याकडे लक्ष दिले नाही तर लोकं रस्त्यावर उतरतील. मागील १ वर्षाचा कोविडचा काळ पाहता राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत बदल करावयास हवा होता. डॉक्टर, परिचारिका, व्हेंटिलेटर बेडस्, हॉस्पिटल इत्यादीच्या संख्येत वाढ करणे अत्यावश्यक होते. लॉकडाऊन लावण्याची वेळ येणे हे शासनाचे अपयश आहे. शंभर टक्के लॉकडाऊन झाले तर छोट्या छोट्या धंदेवाल्यांचे फार मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होणार आहे.