( स्टार ८१३ ) बाहेरचे खाणे झाले बंद, घरच्या जेवणाला नव्याने चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:17+5:302021-06-16T04:33:17+5:30

कोल्हापूर : कोरोनाकाळात आतापर्यंतच्या जगण्याची घडीच बदलली गेली. मग त्यातून स्वयंपाकघर तरी कसे सुटणार. कोराेनाने आरोग्यविषयक जाणिवा अधिक ...

(Star 813) Eating out is off, home food tastes new | ( स्टार ८१३ ) बाहेरचे खाणे झाले बंद, घरच्या जेवणाला नव्याने चव

( स्टार ८१३ ) बाहेरचे खाणे झाले बंद, घरच्या जेवणाला नव्याने चव

कोल्हापूर : कोरोनाकाळात आतापर्यंतच्या जगण्याची घडीच बदलली गेली. मग त्यातून स्वयंपाकघर तरी कसे सुटणार. कोराेनाने आरोग्यविषयक जाणिवा अधिक प्रगल्भ केल्याने जिभेचे चोचले पुरवण्याऐवजी कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीर मजबूत ठेवण्याला अधिक प्राधान्य आले. त्यातूनच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार कसा पोटात जाईल, याचेच नियोजन घरोघरी झाले. या काळात बाहेरचे पार्सल बंद होऊन घरचेच खाण्याला प्राधान्य दिल्याने किचनमध्ये हेल्दी पदार्थांनी पुन्हा एकदा आपले स्थान बळकट केले.

भारतीय खाद्यसंस्कृती तशी अघळपघळ आणि ऋतुमानानुसार बदलणारी, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून प्रदेशनिहाय पदार्थाची रचना झालेली. त्याचे प्रतिबिंबही प्रत्येक स्वयंपाकघरात उमटलेले. त्यामुळे चव आणि पाचकता डोळ्यांसमोर ठेवूनच रोजच्या जेवणाचे बेत आखले जात होते, पण जस-जसे आधुनिकीकरण वाढू लागले तसे आहाराची पारंपरिक घडीही विस्कटत गेली. हॉटेलमध्ये जाऊन खाणे वाढले, पार्सल मागवणे, चटपटीत पदार्थांवर ताव मारणे हे नित्याचेच झाले. पण गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना नकळत येऊन थडकला आणि आहाराच्या बदललेल्या सवयींवर पहिला आघात झाला. नव्या जगाबराेबर बदललेल्या स्वयंपाकघराने पुन्हा एकदा मागे वळून पाहण्यास सुरुवात केली. जुनं ते साेनं म्हणत पुन्हा एकदा गृहिणी पारंपरिक स्वयंपाकघराकडे वळल्या. पिढ्यान् पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेले पदार्थ पुन्हा तयार होऊ लागले. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा आहार काय असावा याचे नियोजन सुरू झाले. वेगवेगळ्या प्रकारचे काढे घरातच तयार करून ते सक्तीने देण्यास सुरुवात झाली.

कच्च्या भाज्या, कडधान्ये

भारतीय स्वयंपाकघर भाज्या, कडधान्यांनी समृद्ध आहे. त्याचे नानाविध पदार्थ करता येतात; पण पाश्चात्त्य पदार्थ खाण्याच्या नादात याला नाके मुरडली जात होती. प्रथिने मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने भाज्या आणि कडधान्याशिवाय पर्यायच राहिला नाही. बाहेरचे पदार्थ येणे बंद झाल्याने आहे. तेच गोड मानून खाताना त्याचीच कधी गोडी लागली हे लॉकडाऊन काळात कळलेच नाही. एरव्ही कडधान्ये, भाजीपाला खायचा म्हटले की तोंड वाकडे व्हायचे. फळे नकोशी वाटायची; पण तेच रोजच्या खाण्यात सक्तीने येऊ लागले. ताटात दूध, ताक, दही, लोणी, तुपाने तर हक्काची जागा घेतली, शिवाय रोजच्या आहारात डाळी, मोड आलेली कडधान्ये, ऊसळ शिवाय मांसाहारी पदार्थदेखील अधिक प्रमाणात येतील याचे नियोजन केले गेले.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

पिझ्झा, बर्गरपासून रोलपर्यंत अनेकविध फास्टफूडची वर्दळच आहारात वाढली होती; पण कोरोनाने या फास्टफूडच्या प्रेमालाच लॉक केले. बाहेरचे फास्टफूड मागवण्यावरही मर्यादा आल्या. त्यामुळे आठवण आलीच तरी घरातच विशेष चमचमीत पदार्थ करून चिभेचे चोचले घरातच पुरवले गेले.

गृहिणी म्हणतात...

आहाराच्या बाबतीत मी नेहमीच दक्ष राहिले आहे. पालेभाज्या, कडधान्य, फळे, दूधदुभते रोजच्या आहारात हवेच, हा माझा आग्रह कोरोनाने अधिक बळकट केला. घरच्यांनी नाके मुरडली तरी त्यांना ते सक्तीने खावेच लागले. बाहेरून पार्सल मागवणे तर पूर्णपणे बंद केले. घरचेच अन्न पोटभर आणि निरोगी पद्धतीने खाल्ले जात असल्याने तब्येती बिघडण्याचाही प्रश्न उरला नाही.

गीतांजली जोशी, कोल्हापूर

कोरोनाच्या अनुभवातून गेल्यानंतर आहाराच्या बाबतीत अधिकच दक्षता घेतली. पालेभाज्या, फळांसह लिंबूचे सेवन रोजच्या आहारात कसे राहील याकडे कटाक्ष ठेवला. बाहेरचे पार्सल पूर्वी आणले जायचे, पण कोरोनामुळे त्यावर पूर्णपणे निर्बंध घातले. मांसाहार असो की शाकाहार ते जास्तीत अंगाला लागेल असेच अन्न शिजवण्यावर भर दिला.

अनुपमा सावंत, कोल्हापूर

Web Title: (Star 813) Eating out is off, home food tastes new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.