स्टार १२०८: सावधान, चायनीज खाल तर पोटविकार मोफत मिळवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:28+5:302021-09-22T04:26:28+5:30
कोल्हापूर : जिभेवर रेंगाळणारी चव आणि वासामुळे चायनीज पदार्थावर यथेच्छ ताव मारला जात असलातरी त्यातील अजिनोमोटोच्या अतिवापरामुळे हे ...

स्टार १२०८: सावधान, चायनीज खाल तर पोटविकार मोफत मिळवाल
कोल्हापूर : जिभेवर रेंगाळणारी चव आणि वासामुळे चायनीज पदार्थावर यथेच्छ ताव मारला जात असलातरी त्यातील अजिनोमोटोच्या अतिवापरामुळे हे पदार्थ पोटासाठी सायलंट किलर ठरू लागली आहेत. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना पोटाचे पुरते वाटोळे होत आहे, आतडे आणि यकृताचे गंभीर आजार होत असून, याकडे दुर्लक्ष होत आहे.
चायनीज पदार्थांचे प्रस्त फारच वाढले आहे. जागोजागी कोपऱ्या कोपऱ्यात दिसणाऱ्या चायनीज सेंटरवर गर्दी असतेच, शिवाय हॉटेलमध्येही चायनीज पदार्थ हमखास मागवून खाल्ले जात आहेत. कोणताही चायनीज पदार्थ अजिनोमोटोशिवाय तयार होऊ शकत नाही. पदार्थाची चव वाढवण्यासाठी ते वापरले जाते; पण अधिक प्रमाणात वापरल्याने पोटविकारांना आयते निमंत्रण मिळत आहे.
१) काय आहे अजिनोमोटो? (बॉक्स)
अजिनोमोटो हे मोनो सोडियम ग्लुटामेट नावाचे एक केमिकल आहे. याला ॲमिनो ॲसिडपण म्हटले जाते. मीठासारखे असते, अन्न रुचकर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेेषत: फास्टफूड असलेले चायनीज नुडल्स, सूप, बर्गर. पिझा यामध्ये जास्त वापर केला जातो. जगभरात १९०८ पासून या अजिनोमोटोचा आहारात वापर केला जात असल्याचे पुरावे सापडतात. पहिल्यांदा जपानमध्ये याचा वापर केला गेला. आता जगभरात त्याच्याशिवाय पान हलत नाही, अशी परिस्थिती आहे.
२) ...म्हणून चायनीज खाणे टाळा (बॉक्स)
अजिनाेमोटो हा एक सायलंट किलर आहे. याच अजिनोमोटोचे प्रमाण चायनीज पदार्थात जास्त वापरले जात असल्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. हे वाढल्याने तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटी अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात. सतत हे पदार्थ खाल्ल्याने पोटातील आतडे व लिव्हरवर परिणाम होऊन त्याला इन्फेक्शन होणे, सूज येणे, कावीळ होणे आदी आजार वाढतात. लठ्ठपणा, निद्रानाश, उच्च रक्तदाब हेदेखील आजार जडतात.
३) तज्ज्ञ डॉक्टरांचा कोट
चायनीज पदार्थ खायला कितीही चांगले असले तरी ते पोटाला मारक आहे. त्यातील अजिनोमोटो हे रसायन तर शरीराला फारच घातक आहे. आतड्यावर, लिव्हरवर थेट परिणाम होत असल्याने लिव्हरला सूज येणे, डायरिया होणे, गंभीर प्रकारची कावीळ होणे याचा धोका असतो.
डॉ. दीपक पाटील, पोटविकार तज्ज्ञ, कोल्हापूर