स्टार ११५३...शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:25+5:302021-09-09T04:31:25+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे झालेली दलदल, पाऊस, ॲप लवकर ओपन होत नसल्याने राज्य सरकारची ‘ई-पीक’ ...

Star 1153 ... Fever of 'e-peak' inspection on farmers' heads | स्टार ११५३...शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप

स्टार ११५३...शेतकऱ्यांच्या डोक्याला ‘ई-पीक’ पाहणीचा ताप

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामुळे झालेली दलदल, पाऊस, ॲप लवकर ओपन होत नसल्याने राज्य सरकारची ‘ई-पीक’ पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे एकीकडे शेतकरी हैराण असताना सरकारने मात्र ते लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्ह्यात ६ सप्टेंबरपर्यंत केवळ ४६ हजार ७२६ शेतकऱ्यांनीच ही माहिती भरली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये काय पीक केले, त्यासाठी पाण्याची काय व्यवस्था आहे याबाबत वर्षाला माहिती जमा केली जाते. आतापर्यंत तलाठी संबंधित शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून माहिती घेत होते. मात्र, राज्य सरकारने ‘ई-पीक’च्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांनीच भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शेतकऱ्यांनी संबंधित गट नंबरमध्ये जाऊन मोबाईल ॲपव्दारे ही माहिती भरायची आहे. आपला देश किती तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रगत झाल्याच्या आपण गप्पा मारत असलो तरी अजूनही शेतकरी या ज्ञानापासून चार हात लांबच आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत. त्यामुळे ही माहिती भरायची कशी या पेचात शेतकरी आहे. त्यातच महापुरामुळे अजूनही नदीकाठच्या शिवारात दलदल आहे, त्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने नद्यांचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने शिवारात जाऊन माहिती भरताना अग्निदिव्य पार पाडावे लागत आहेत. त्यातही अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. १५ सप्टेंबरपर्यंतची सरकारने मुदत दिली आहे. विहीत वेळेत केले नाहीतर पीक विम्यासह इतर सुविधा दिल्या जाणार नसल्याचा फतवा सरकारने काढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वाड्यावस्त्यांवर रेंज कशी येणार....

जिल्ह्यात तीन-चार तालुके सोडले तर इतर तालुक्यात वाड्यावस्त्या व डोंगर कपारीमध्ये गावे आहेत. तिथे मोबाईलची रेंजही पोहोचत नाही. अशा ठिकाणी ॲप ओपन होणार कसे? तो शेतकरी माहिती भरणार कशी? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.

‘ई-पीक’ पाहणी म्हणजे काय रे भाऊ....

जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना ‘ई-पीक’ पाहणी म्हणजे काय हेच माहीत नाही. ही माहिती भरायची तर खूप लांबचे आहे. मुळात ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली त्या यंत्रणेने माहिती देताना नेमके किती शेतकरी उपस्थित होते, हे पाहणेही गरजेचे आहे.

तालुकानिहाय खातेदारांनी केलेली नोंदणी -

पन्हाळा - ५३११

राधानगरी - ४१९६

हातकणंगले - ४१६८

चंदगड -३८९५

करवीर -३६८५

गडहिंग्लज - ३६७०

आजरा -२९१३

शाहूवाडी - २८०८

कागल-२५६६

शिरोळ - २०७१

भुदरगड -११५१

गगनबावडा -११३१

ही माहिती भरावी लागते-

खातेदाराचे नाव

क्षेत्र

जलसिंचनाची व्यवस्था

सिंचनाखालील क्षेत्र

पिकांचे वर्णन व सोबत पिकाचा फोटो

कोट-

‘ई-पीक’ पाहणी याबाबत आम्हांला काहीच माहिती नाही. मोबाईलवर माहिती भरण्यास सांगितले खरे, मात्र आमच्याकडे महागडे मोबाईल आणायचे कोठून.

- बाबूराव खाडे (शेतकरी)

Web Title: Star 1153 ... Fever of 'e-peak' inspection on farmers' heads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.