समाजकार्य करणाऱ्या मंडळास ५० टक्के खर्च देणार
By Admin | Updated: August 28, 2015 01:00 IST2015-08-28T01:00:41+5:302015-08-28T01:00:52+5:30
चंद्रकांतदादा पाटील : ‘गणराया अवॉर्ड’चे थाटात वितरण; डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन

समाजकार्य करणाऱ्या मंडळास ५० टक्के खर्च देणार
कोल्हापूर : नको त्या गोष्टींमध्ये ईर्ष्या वाढत आहे. हे तरुणांनीच थांबविले पाहिजे. आपला आनंद व्यक्त करताना समाजाला वेठीस धरू नका. जी मंडळे यंदा गणेशोत्सवात दुष्काळग्रस्तांसाठी व समाज प्रबोधनात्मक कार्य करणार आहेत, अशा मंडळांनी येणाऱ्या खर्चाची ५० टक्के रक्कम प्रथम दाखवावी व उर्वरित ५० टक्के रक्कम माझ्याकडून घ्यावी, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
शाहू स्मारक भवनात गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाच्या ‘गणराया अवॉर्ड’च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शाहू महाराज उपस्थित होते. यंदा सर्वसाधारण विजेतेपद मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने पटकाविले.
पाटील म्हणाले, गणेशोत्सव काळात ४८ तास पोलीस रस्त्यांवर असतात. सामाजिक बांधीलकी म्हणून मंडळांनी पोलिसांच्या चहा, नष्टा व जेवणाची व्यवस्था करावी. याबाबत मंडळांची बैठक घेऊन पोलिसांच्या जेवणाचे नियोजन केले जाईल.
शाहू महाराज म्हणाले, तरुण मंडळांनी अवास्तव खर्चाला फाटा देऊन समाजप्रबोधनाद्वारे गणेशोत्सव साजरा करावा.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मी कधीही डॉल्बीचे समर्थन केले नाही. त्याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच काहीजण मंडळाच्या नावाने बोगस पावती करतात, असे निदर्शनास येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा म्हणाले, यंदा न्यायालयाच्या वतीने ध्वनिप्रदूषणाच्या कायद्यात कडक कारवाई सुचविली आहे. आम्ही जर कारवाई केली नाही तर आमच्यावर कारवाई होऊ शकते; त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कडक पावले उचलावी लागतील. याप्रसंगी महापौर वैशाली डकरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते.
टोलविरोधी कृती समितीचे निवासराव साळोखे, कादर मलबारी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी प्रास्ताविक केले; तर भारतकुमार राणे यांनी आभार मानले.
सरकारला असाही हातभार...
रस्ते विकास प्रकल्पांच्या रकमेबाबत बोलणी सुरू असून, जी काही रक्कम द्यावी लागेल, त्या रकमेत कोल्हापूरचा नागरिक या नात्याने समाज प्रबोधनात्मक देखाव्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या राजारामपुरीतील युवक मित्रमंडळाच्या वतीने मिळालेली बक्षिसाची रक्कम सरकारला हातभार म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे दिली.