कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य

By Admin | Updated: July 19, 2014 00:21 IST2014-07-19T00:19:33+5:302014-07-19T00:21:46+5:30

दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारण

South and Chandgad can be switched to Kolhapur | कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य

कोल्हापूर दक्षिण व चंदगडची अदलाबदल शक्य


विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
कोल्हापूर दक्षिण व चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीत अदलाबदल करण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत, असा निर्णय लोकसभा निवडणुकीवेळीच शिवसेना व भाजपमध्ये झाला होता व त्यास भाजपच्या नेत्यांनी संमती दिल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे, अशी अदलाबदल करण्यात या दोन्ही पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही कारणीभूत आहे.
सध्या कोल्हापुरातील दहापैकी आठ जागा शिवसेनेकडे, तर इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण या दोन जागा भाजपकडे आहेत. प्रदेश भाजपने लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागा वाढवून देण्याचा आग्रह धरला आहे; परंतु त्यास शिवसेना तयार नाही. महायुतीत या दोन पक्षांशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन (आठवले गट) पक्षही सहभागी आहेत. जिल्ह्यात आठवले गटाची ताकद आहे; परंतु हातकणंगले विधानसभा या राखीव मतदारसंघातून शिवसेनेचे सुजित मिणचेकर आमदार असल्याने पुन्हा या पक्षाला जागा दिली जाण्याची शक्यता नाही. मध्यंतरी दुर्वास कदम यांनी वाढदिवसाचे शहरभर फलक लावून शक्तिप्रदर्शन केले. त्यामागे दक्षिणमधील उमेदवारीचे राजकारण होते. शिवसेना-भाजपशिवाय महायुतीत ‘स्वाभिमानी’ हा प्रबळ घटक पक्ष आहे. या पक्षाने किमान पाच जागांची मागणी केली आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला कुणाच्या कोट्यातील जागा द्यायच्या, हा खरा वादाचा मुद्दा बनत आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रत्येकी एक जागा ‘स्वाभिमानी’साठी सोडण्याच्या विचारात आहेत. त्यातील ‘शिरोळ’ शिवसेना सोडणार आहे. भाजपकडे दोनच मतदारसंघ आहेत. त्यातील ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये ‘स्वाभिमानी’ची ताकद नाही. त्यामुळे चंदगडची जागा शिवसेनेने भाजपला द्यायची व त्याबदल्यात भाजपने कोल्हापूर दक्षिणची जागा शिवसेनेला द्यायची, असा हा अदलाबदलीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याची एक चंदगडची जागा स्वाभिमानीसाठी सोडता येऊ शकेल, असे त्यामागील गणित आहे. या हालचाली ज्यांना मान्य नाहीत त्याच नेत्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अडचणीच जास्त...
ही जागा जरी भाजपने सोडली, तरी दोनच जागांवर स्वाभिमानी तयार होण्याची शक्यता नाही. शिरोळ, राधानगरी व चंदगड या तीन मतदारसंघांत ‘स्वाभिमानी’ची चांगली ताकद आहे. राधानगरी मतदारसंघात जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी करूनच टाकली आहे. त्याशिवाय स्वाभिमानीला शाहूवाडी हादेखील मतदारसंघ अथवा आम्ही म्हणतो तोच उमेदवार, असा खासदार राजू शेट्टी यांचा आग्रह आहे.

‘स्वाभिमानी’...बद्दल
स्वाभिमानी हा पक्ष भाजपच्या कोट्यातील आहे. त्यामुळे भाजपनेच त्यांना जागा सोडाव्यात, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. लोकसभेत संघटनेची मदत न झाल्यामुळेच संजय मंडलिक यांचा पराभव झाला, असे शिवसेनेच्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला कळविले आहे, तर शिवसेनेतील लाथाळ्यांमुळेच मंडलिक पराभूत झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शिवसेना अशी कोंडी करण्याची चिन्हे दिसल्यानेच ‘स्वाभिमानी’नेही स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

Web Title: South and Chandgad can be switched to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.