शाळेचा प्रश्न सोडवा, मगच चौपदरीकरण
By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-27T23:52:23+5:302015-05-28T00:58:59+5:30
निमशिरगावची शाळा रामभरोसे : ग्रामस्थच करणार शाळेची डागडुजी; अवजड वाहनांना बंदी घालणार

शाळेचा प्रश्न सोडवा, मगच चौपदरीकरण
संदीप बावचे -जयसिंगपूर -निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक शाळा सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत जात असल्याने गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी जागेचा प्रश्न अजूनही भिजतच पडला आहे. जागा मूल्यांकनावरून प्रशासकीय पातळीवर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळेच्या जागेचा प्रश्न आता रामभरोसेच राहिला आहे.
दरम्यान, लोकवर्गणीतून शाळेची डागडुजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, जोपर्यंत जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही, तसेच कोणत्याही अवजड वाहनांना रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेने शाळा हस्तांतराचा दाखला दिला, नवीन जागेचा ठरावही झाला मात्र; शाळा हस्तांतरित झाल्यामुळे शाळेच्या डागडुजीचा निधीही नाही व नवीन जागाही नाही, अशी अवस्था प्राथमिक शाळेची बनली आहे. धोकादायक असलेल्या या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्यामुळे ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था शाळेची बनली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सुमारे तीनशे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने वेळोवेळी शासकीय कार्यालयामध्ये लेखी निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेची इमारत मोडकळीस आली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना धोकादायक बनलेल्या इमारतीचे पर्यायी जागेत बांधकाम करून देणे गरजेचे आहे. दरम्यान, जागेबाबतचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिरायत जमिनीप्रमाणे साडेचार लाख, बागायत जमिनीप्रमाणे सहा लाख, तर बिगर शेतीप्रमाणे हेक्टरी २५ लाख रुपये किंमत होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने या तांत्रिक बाबी पुढे केल्याने जागेचा प्रश्न आणखीन कठीण होत चालला आहे. जागा मूल्यांकनाच्या या प्रश्नामुळे हा प्रश्न आणखी किती वर्षे भिजत पडणार, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. शाळा इमारत मोडकळीस आल्यामुळे येत्या जूनमध्ये शाळा भरवायची कोठे, हा प्रश्न गंभीर बनल्यामुळे आता ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी पडण्याच्या स्थितीत असलेल्या तीन खोल्या वापरात न आणता उर्वरित खोल्यांची डागडुजी केली जाणार आहे. जोपर्यंत शाळेचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत गावातील रस्त्यांचे काम करू देणार नाही, तसेच कोणत्याही अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्याचाही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
‘शासकीय काम, सहा महिने थांब’
दोन वर्षांपूर्वी शाळेच्या नवीन इमारतीसाठी गावालगत असणाऱ्या एक हेक्टर ४२ आर. या जागेच्या मागणीचा गावसभेपुढे ठराव घेण्यात आला आहे. अद्याप शाळेला जागा मिळालेली नाही. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासकीय पातळीवर कागदी घोडे नाचविले जात आहेत. या चालढकल प्रकारामुळे ग्रामस्थ आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.