कोल्हापुरात भरणार भटक्या-विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:34+5:302021-02-20T05:11:34+5:30
कोल्हापूर : राज्यकर्त्यांकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी ...

कोल्हापुरात भरणार भटक्या-विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद
कोल्हापूर : राज्यकर्त्यांकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय सामाजिक न्याय हक्क परिषद भरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याचे नियोजन करण्याचे शुक्रवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत ठरविण्यात आले.
दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भटक्या-विमुक्त जमाती विचार मंचच्या बैठकीत भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी राज्यभरातील आवाज एकत्रित करण्याचे ठरले. या बैठकीत दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
वर्षानुवर्षे भटके आयुष्य जगणाऱ्या या समाजाला स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सोईसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडून योजना जाहीर होतात; पण त्याचा लाभ मिळत नाही. जातीचे, रहिवासाचे दाखले मिळत नाहीत; त्यामुळे घरकुलसारख्या याेजनांचे लाभ मिळत नाहीत. एनटी, व्हीजेएनटीअंतर्गत आरक्षण मिळते; पण त्याद्वारे नोकऱ्या मिळत नाहीत. आदिवासींच्या जागा भरल्या जात नाहीत. भटक्या-विमुक्त समाजाला एस.सी.मध्ये समाविष्ट करण्याची १९५० पासूनची मागणी आहे; पण त्याची पूर्तता झालेली नाही. या सर्व प्रलंबित प्रश्नांवर विचारमंथन करून समाजाची पुढील दिशा काय असेल, याबाबत या परिषदेत धोरण ठरवले जाणार आहे, असे व्यंकाप्पा भोसले यांनी स्पष्ट केले.
बैठकीला गणेश काळे, सुरेश चव्हाण, सुनील भोसले, शिवाजी कोरवी, तानाजी नंदीवले, राजू काळे, सुनील पवार, रामचंद्र पोवार, रामसिंग रजपूत, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.