...तर मंत्र्यांना भागात फिरणं अवघड होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:29+5:302021-09-25T04:25:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नुकसानभरपाईसाठी आता जास्त वेळ थांबण्याची पूरग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही तेव्हा राज्य सरकारने येत्या ...

...तर मंत्र्यांना भागात फिरणं अवघड होईल
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नुकसानभरपाईसाठी आता जास्त वेळ थांबण्याची पूरग्रस्त शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही तेव्हा राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत जाहीर केलेली नुकसानभरपाई द्यावी अन्यथा मंत्र्यांना भागात फिरणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला.
शेट्टी म्हणाले, बुधवारच्या कॅबिनेटच्या बैठकीकडे आमचं लक्ष होते. सरकार जर वेळकाढूपणा करत असेल तर पुन्हा पूरग्रस्तांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. मराठवाड्यात अजून पाऊस पडत असून तेथील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, असे सांगण्यात येते. परंतु आता पश्चिम महाराष्ट्र , कोकणातील पूरग्रस्तांचे पंचनामे झाले आहेत. त्यांची आता जास्त वेळ थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. दोन महिने होऊन गेले. एकदा काय देणार ते सांगा, देणार असाल तर किती मदत देणार ते सांगा, नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, जास्तीत जास्त आठ दिवस वाट बघू, त्यानंतर मंत्र्यांना भागात फरणे अवघड होईल,
मुंबई बँकेचे काय करणार..?
भाजपचे किरीट सोमय्या काही विशिष्ट लाेकांच्या मागे लागले आहेत. त्यांची भूमिका चुकीची आहे. तुमच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करू नका. भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधात बोलायचेच असले तर ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने बोला. मग लाेक तुमच्यावर विश्वास ठेवतील. सोमय्या ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने त्यांनी मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचारसुध्दा बाहेर काढायला पाहिजे. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत, असे शेट्टी यांनी सांगितले.
ऊस परिषद दसऱ्यानंतरच
ऊस परिषद दसरा झाल्यानंतर घेण्याचा आमचा विचार आहे. कोणीही कितीही आडकाठी आण्याचा प्रयत्न केला तरी ऊस परिषद ही होणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. त्यामुळे कोल्हापूरचा हंगामही नोव्हेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.