आटपाडीत श्रावणमासी दु:ख मानसी...
By Admin | Updated: September 3, 2015 23:43 IST2015-09-03T23:43:24+5:302015-09-03T23:43:24+5:30
तालुक्यातील स्थिती भयावह : साडेचार हजार एकरवरील द्राक्षबागा धोक्यात; डाळिंब बागाही वाळल्या

आटपाडीत श्रावणमासी दु:ख मानसी...
अविनाश बाड- आटपाडी -डोक्यावरून नुसतेच पळणारे ढग... जोराचे वाहणारे वारे... आणि त्यामुळे उडणारा फुपाटा! असे सध्या आटपाडी तालुक्यात ‘श्रावणमासी दु:ख मानसी’ असे विदारक चित्र आहे. परतीच्या पावसाची लोक चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून ते आॅगस्ट या दरम्यानच्या कालावधित गेल्यावर्षी तालुक्यात सरासरी ३५५ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविली. खरीप हंगाम वाया गेलाच; पण सुमारे ४ हजार ५०० एकर डाळिंबाच्या बागांना गेल्या १५ दिवसांपासून टँकरने पाणी दिले जात आहे. या दुष्काळामुळे तालुका २५ वर्षे मागे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आटपाडी तालुक्यात हमखास परतीचा मान्सून बरसतो; पण खरीप हंगामासाठी तुरळक आणि उन्हाळी पाऊस पडतो. त्यावर कापसासह खरिपातील इतर पिकांची मदार असते. गेल्यावर्षी जून ते आॅगस्टदरम्यान आटपाडीत ३७३ मिमी, दिघंचीत ४१२ मिमी, तर खरसुंडीत २८२ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. यंदा आटपाडीत ५२ मिमी, दिघंचीत १७८ मि.मी., तर खरसुंडीत १०० मि.मी. पावसाची नोंद आहे. एवढा कमी पाऊस आणि तोही सर्वत्र पडलेला नाही. तालुक्यात फक्त आटपाडी, दिघंची आणि खरसुंडी या ठिकाणी पावसाची नोंद होते. त्यामुळे एवढा पाऊससुद्धा पडलेला नाही. पावसाअभावी बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल, तीळ ही ९ हजार ४१२ हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीसह बियाणे, पेरणी आणि खतांच्या खर्चाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे. केवळ जिरायत क्षेत्रातील पिकेच नव्हे, तर बागायती क्षेत्रातील पिकेही विहिरी आटल्याने पूर्णपणे वाया गेली आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. माणगंगा नदीसह तालुक्यातील सर्व ओढे, नाले, कोरडे पडले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जात आणखी भर घातली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना लखपती बनण्याचे स्वप्न दाखविणारे डाळिंब सध्या धोक्यात आहे. शेतकरी जून महिन्यात बागा धरतात. छाटणी, खते घालून पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी आता लाखो रुपये खर्च केले आहेत. सध्या डाळिंबाच्या झाडाला छोटी-छोटी डाळिंबे लागली आहेत. पण गेल्या १५ दिवसांपासून विहिरी आटल्याने शेतकरी मिळेल तेथून टँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीड हजार रुपयांना एक टँकर पाणी विकत घेऊन पुढचे साडेचार ते पाच महिने बागा जगविणे शेतकऱ्यांना केवळ अशक्य आहे. डाळिंबाच्या उत्पन्नापेक्षा पाण्याचाच खर्च अनेकपट होण्याची भीती आहे. एवढी शेतकऱ्यांची कुवतही नाही. पण येत्या ८-१५ दिवसात पाऊस पडेल, या आशेने शेतकरी वाट्टेल ते करुन टँकरने पाणी आणून विहिरीत ओतत आहेत. तिथून मग ठिबक सिंचनने बागांना देत आहेत. तरीही हे पाणी अपुरे पडू लागले आहे. थोडे दिवस पावसाची वाट पाहूनही, पावसाने दगा दिला, तर शेतकऱ्यांना डाळिंब बागा सोडाव्या लागतील. निसर्ग शेतकऱ्यांची कठीण परीक्षा घेत आहे. बागा सोडाव्या लागल्या, तर शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
तालुक्यातील तलावांतील पाणी वेगाने कमी होऊ लागले आहे. आटपाडी तलावासह सर्व तलावांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात दुष्काळात तालुक्यात टँकर भरायलाही पाणी नव्हते. तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
ग्रामीण भागातील महिलांनी दुष्काळाला दहा तोंडांच्या रावणाची उपमा दिली आहे. आटपाडी तालुका पुन्हा एकदा दुष्काळाच्या भीतीने हबकून गेला आहे. काही सफेद बोके आणि सरकारी बाबू मात्र या दुष्काळरूपी रावणाच्या आगमनाने मालामाल होण्याची स्वप्ने रंगवू लागले आहेत. या कठीण परिस्थितीचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून....
पाऊस का बॉडी स्प्रे?
आटपाडी तालुक्यात जेमतेम आटपाडी, दिघंची आणि खरसुंडी या तीनच ठिकाणी शासकीय पर्जन्यमापक आहेत. अलीकडे अनेकवेळा केवळ हजेरी लावण्यापुरतेच अतिशय कमी प्रमाणात पावसाचे थेंब पडत आहेत. या थेंबांमुळे धड डांबरी रस्ताही ओला होत नाही. त्यामुळे याला पाऊस म्हणायचे, की बॉडी स्प्रे? असा प्रश्न निर्माण होत आहे. खरसुंडीत आॅगस्ट महिन्यात चार दिवसांतील तीन दिवस एक मि.मी., तर दि. २० रोजी दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आटपाडीत एक मि.मी. दोनदा, तर आठ मि.मी. एकदा आणि दिघंचीत गेल्या महिन्यात फक्त एक दिवस एक मि.मी. पाऊस पडल्याची शासकीय नोंद आहे. प्रत्यक्षात कमी पडणाऱ्या या पावसाचा कुणालाच कसलाही उपयोग नाही.
पीक पैसेवारी
वर्षखरीपरब्बी
२६ गावे३४ गावे
२०१३२५ ते ४० पैसे१८ ते ३४ २०१४१८ ते ३८ पैसे७७ ते ८४ २०१५५२ ते ४९ पैसे ६० ते ६७