‘शिवराज्याभिषेक’ लोकोत्सव व्हावा
By Admin | Updated: May 21, 2014 17:38 IST2014-05-21T01:11:08+5:302014-05-21T17:38:51+5:30
संभाजीराजे : किल्ले संवर्धनाबाबत ६ जूनलाच निर्णय

‘शिवराज्याभिषेक’ लोकोत्सव व्हावा
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्टÑाचा राहिला नसून संपूर्ण देशात पोहोचला आहे. आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांच्या पुढाकारातून लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा, असे आवाहन करत महाराष्टÑातील किल्ले संवर्धनाबाबत ६ जूनलाच आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने ६ जूनला रायगड येथे होणार्या शिवराज्याभिषेक सोहळा तयारीबाबत भवानी मंडप येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मोदी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी रायगडावर जाऊन छत्रपतींना नतमस्तक झाले होते. राजस्थानमधील किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शासन घेते, मग महाराष्टÑातील किल्ल्यांबाबत अनास्था का? येथील किल्ल्यांबाबतच राजकारण का? यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशी आवाज उठविला जाईल. यावर्षी शिवभक्तांसाठी ३५० रुपये प्रवासाचे घेतले जाणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. गणी आजरेकर, महेश जाधव, राहुल भोसले, प्रवीण कारंडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक देसाई, डॉ. जयश्री चव्हाण, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, वसंतराव मुळीक, विनायक फाळके, इंद्रजीत घाटगे, आझाद नायकवडी उपस्थित होते. (प्रतिनिधी)