शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:51 IST2016-09-08T00:32:25+5:302016-09-08T00:51:05+5:30
बहुमान : सांडपाणी प्रक्रियेसाठी वनस्पतीचा वापर

शिवाजी विद्यापीठाचे संशोधन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर
कोल्हापूर : रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. हे शिवाजी विद्यापीठाचे संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे. विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनास हा बहुमान मिळाला आहे.
जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती प्रकाशित केली आहे. त्याला या विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.
विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. पी. गोविंदवार यांना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धिकरणविषयक संशोधनासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रकल्प मंजूर झाला होता. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच ‘पायलट स्केल रिक्टर’ बनविण्यात आले. या प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या (६६६.ुि३्रल्ल्िरं.ल्ल्रू.्रल्ल) या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी
डॉ. ज्योती जाधव, विश्वास बापट, अनुराधा कागलकर, राहुल खंडारे, अखिल काब्रा, अनुप्रिता वाठारकर, अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम, स्वप्निल पाटील यांचे योगदान लाभले. (प्रतिनिधी)
नवा मानदंड प्रस्थापित : कुलगुरू
या संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. यू. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र विभागाच्या संशोधनाला मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून तसे टिष्ट्वटही केले आहे.
- प्रा. एस. पी. गोविंदवार, जीवनरसायनशास्त्र विभाग