शिवसेनेचे तगडे आव्हान.. कॉँग्रेस मात्र सुस्तच..!

By Admin | Updated: June 10, 2014 02:09 IST2014-06-10T02:07:29+5:302014-06-10T02:09:37+5:30

कॉँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत अपेक्षित : काँग्रेसकडून मालोजीराजे, सत्यजित कदम, इंगवले आदींची नावे चर्चेत

Shiv Sena's strong challenge .. Congress is lazy ..! | शिवसेनेचे तगडे आव्हान.. कॉँग्रेस मात्र सुस्तच..!

शिवसेनेचे तगडे आव्हान.. कॉँग्रेस मात्र सुस्तच..!

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे तगडे आव्हान भेदण्याचे अवघड काम सर्वच राजकीय पक्षांसमोर निर्माण झाले आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. कॉँग्रेस आघाडी पंधरा वर्षे सत्तेत असूनदेखील दोन्ही पक्षांचे राजकीय अस्तित्व कधी जनतेला दिसलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा दावा कितीही केला, तरी त्यास भ्रष्टाचाराची कीड लागल्याने पक्ष आणि नेत्यांविषयी लोकांत कमालीचा संताप आहे. केंद्रात ‘नमो’चा प्रभाव शहरी मतदारांवर आहे. मोठी विकासकामे केल्यानंतरसुद्धा जनतेचा विश्वास गमावल्यासारखी कोल्हापूर उत्तरमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती आहे. कॉँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत या मतदारसंघात अपेक्षित आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार मालोजीराजे, सत्यजित ऊर्फ नाना कदम, रविकिरण इंगवले आदींची नावे आता चर्चेत आहेत.
महाराष्ट्रातील कॉँग्रेस आघाडीच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. पंचगंगा नदीचे प्रदूषण कायम आहे. व्यापारी वर्ग जकात रद्द करून एलबीटी लागू केल्यामुळे हताश आहेत. मोठे उद्योजक वीज दरवाढ आणि औद्योगिक वसाहतीमधील गैरसोयींनी हैराण झाले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. रस्ते प्रकल्प व टोलप्रश्नी तर जनतेने आजच तिसऱ्यांदा मोर्चा काढून विरोध दर्शवला आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांविषयी कमालीची नाराजी आहे. कोणताही घटक सरकारच्या कामाबाबत समाधानी नाही. त्याचा आयता लाभ शिवसेनेला होईल.
विधानसभेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत असल्याने कॉँग्रेसला सुधारण्याची वेळ गेली आहे. कितीही जोडण्या केल्या तरी कमीच होतील अशी स्थिती आहे. याउलट शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर जनतेच्या प्रश्नांवर नेहमी रस्त्यावर राहिले. सतत लोकांसोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यांना धोका आहे तो स्वकियांचा! गेल्या निवडणुकीत अशी धोकाबाजी होऊनही ते विजयी झाले होते. मात्र, यावेळची परिस्थिती जरा वेगळी आहे. क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वाद समाधानकारक मिटला नाही, तर मात्र क्षीरसागर यांच्या अडचणी वाढतील. संजय पवार यांनाही आमदार व्हायचे आहे. त्यामुळेच त्यांचेही योग्य पुनर्वसन करण्याचा शब्द पक्षप्रमुखांनी देऊन त्यांची नाराजी दूर केली तरच क्षीरसागर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
कॉँग्रेसकडून गतनिवडणुकीत मालोजीराजे छत्रपती यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. त्यांच्याविषयी त्यावेळी तशी कोणतीही नाराजी कार्यकर्त्यांत आणि जनतेतही नव्हती, परंतु निवडून येणारच या भ्रमात गाफील राहिल्याने त्यांचा पराभव झाला. काँग्रेसमधूनही काहीप्रमाणात दगाबाजी झाली. पराभवानंतर मालोजीराजे पायाला भिंगरी बांधून जनतेत मिसळले असते तर ते कडवे आव्हान निर्माण करू शकले असते. पुण्यातील शैक्षणिक संस्थेत लक्ष घातल्याने जनतेपासून सोडाच, जवळच्या कार्यकर्त्यांपासूनही ते दुरावले. राजे आहेत कोठे असे विचारण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली होती. धनंजय महाडिक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी मेळावा घेऊन सक्रिय होत असल्याचा संदेश दिला, पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरही राजे पुन्हा गायब. त्यांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता कार्यकर्त्यांनाही लागलेला नाही. खरे तर शिवसेनेतील धुसफूस, नाराजी आणि मंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांच्या पाठबळामुळे त्यांना संधी आहे; पण राजेच हातपाय हलवताना दिसत नाहीत. मालोजीराजेंच्या हालचाली शांत असल्या तरी कॉँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असलेले नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी तयारी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी टोल आंदोलनात खुर्च्या मांडण्यापासून भागीदारी केली आहे. एलबीटीच्या आंदोलनात भाग घेतला आहे. गणेशोत्सव, शिवजयंती याच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक तालमी, मंडळांच्या संपर्कात आहेत. वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा पुढाकार आहे. स्वत:च्या ताकदीवर दहा कोटींचा निधी राज्य सरकारकडून आणून तो नगरसेवकांना त्यांच्या भागातील विकासकामांना वितरित केला आहे. त्यांचे वडील माजी महापौर शिवाजीराव कदम यांची राजकीय पुण्याई त्यांच्या सोबत आहे. शिवाजीराव मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असून, पेठा-पेठांमध्ये त्यांचा पूर्वीपासून जनसंपर्क आहे. त्याचा लाभ सत्यजितना होऊ शकतो. शिवाय शहरातील महाडिक गटही त्यांच्या पाठिशी राहू शकतो. कॉँग्रेसकडून नगरसेवक रविकिरण इंगवले हे सुध्दा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
डाव्या विचारसरणीचा पगडा असलेल्या या शहरात शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, जनता दल यांची झालेली वाताहत लक्षात घेता केवळ उत्सुकता म्हणून या पक्षाचा उमेदवार कोण एवढीच उत्त्सुकता असेल. भाकपतर्फे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह दिसतो. कारण सद्य:स्थितीत त्यांच्याकडे एवढे एकच खणखणीत नाणं आहे. शेकापतर्फे संभाजीराव जगदाळे, प्राचार्य टी. एस. पाटील यांची नावे चर्चेत आहेत.मतदारांवर असलेला ‘नमो’चा प्रभाव, जनतेसोबत असण्याचा फायदा लक्षात घेता सध्यातरी महायुतीच अग्रेसर दिसते. याउलट कॉँग्रेस अद्यापही झोपलेली आहे. (उद्याच्या अंकात : करवीर मतदारसंघ)
 

Web Title: Shiv Sena's strong challenge .. Congress is lazy ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.