उदगांव : शिरोळ तालुका हा वैज्ञानिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. तालुक्यात विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते; तर अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतींनी उच्चांकी उत्पादन घेतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यात हजारो एकर शेती अतिपाण्यामुळे क्षारपड झाली आहे. विविध संस्था क्षारपड शेती सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत असून, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानात शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी केले.
चिंचवाड (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका पथदर्शी प्रकल्पअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण झाले. यावेळी कृषी अधिकारी भोसले बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी संजय सुतार यांनी स्वागत केले. जैनापूर शरद कृषी महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण तोडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच ज्योती काटकर, उपसरपंच सचिन पाटोळे, अरुण गोधडे, राजाराम घाटगे, पोपट चव्हाण, सुजाता तावरे, कृषी साहाय्यक स्वाती माळी, सुनील मोरे उपस्थित होते.