आजऱ्यात राष्ट्रवादीसह शिंपी गटात उत्साह
By Admin | Updated: August 30, 2015 23:05 IST2015-08-30T23:05:00+5:302015-08-30T23:05:00+5:30
जयवंतराव शिंपींचे राजकीय पुनर्वसन : तालुका संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजयाने बळ

आजऱ्यात राष्ट्रवादीसह शिंपी गटात उत्साह
ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -तडजोडीच्या राजकारणात नकळतपणे घेतल्या गेलेल्या एखाद्या निर्णयाची इतकी मोठी किंमत मोजावी लागते की, जवळचेही दूर जातात. अपयशाची परंपरा सुरू होते, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पुन्हा संधीची वाट पाहणे एवढेच हाती राहते आणि ती संधी मिळाल्यावर पुन्हा राजकीय पटलावर मनाजोगे फासे पडू लागतात असाच काहीसा प्रकार जयवंतराव शिंपी यांच्याबाबत घडला. तालुका संघ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील विजयाने केवळ जयवंतरावांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही, तर राष्ट्रवादीचेही ‘बळ’ वाढले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. गत जिल्हा बँक निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही उमेदवारी ऐनवेळी काशीनाथअण्णा यांना दिली आणि राजकीय पिछेहाट स्वत:हून ओढवून घेतली. बळिरामदादांचा शब्द डावलायचा नाही म्हणून उमेदवारीसह ठरावांची रसदही काशीनाथअण्णा चराटी यांना पुरविली. दुर्दैवाने काशीनाथअण्णा, बळिरामदादांचे निधन झाले. याचा फटका जयवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीस बसला. वरिष्ठ नेत्यांनी काशीनाथअण्णांच्या जागी जिल्हा बँकेत अशोकअण्णांची वर्णी लावली. आणि नवीन राजकीय समीकरणात विरोधक वाढले ते एकवटले.एकीकडे कारखान्याच्या अडचणी वाढत असतानाच दुसरीकडे राजकीय खिंडीत पकडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी झाले. कारखाना, जिल्हा परिषद येथे एकतर्फी लढत देऊन निसटत्या पराभवांना सामोरे जावे लागले. तालुक्यात सर्वांत प्रबळ असणाऱ्या ‘शिंपी’ गटाची मोडतोड झाली. आघाड्यांचे नवीन राजकारण तालुक्यात अस्तित्वात आले. राजू पोतनीस, प्रकाश कुंभार यांच्यासारखे खंदे समर्थक विरोधकांच्या छावणीत दाखल झाले. होणाऱ्या सर्व घडामोडी शांतपणे पाहत जयवंतरावांनी तब्बल साडेचार वर्षे राजकीय वनवास भोगला. राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या कुरबुरींचा परिणाम म्हणून के. पी. पाटलांना आमदारकी गमवावी लागली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना राष्ट्रवादीलाही नेटक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज भासू लागली. राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनी जयवंतरावांना जवळ केले. जयवंतरावांनाही फायदा झाला. राष्ट्रवादीचेही बळ वाढले. जयवंतरावांची अपयशाची मालिका खंडित झाली.
जनता बँक आणि साखर कारखान्यात सक्षम पॅनेल बनण्यास ‘जयवंतराव’ नावाचे वलय राष्ट्रवादीला उपयोगी ठरणार आहे. उतावळेपणामुळे तालुक्यातील अनेकांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येत असताना संयमाने राजकारण करणाऱ्या जयवंतरावांना मात्र पुन्हा ‘लिफ्ट’ मिळत आहे.