दारू, जेवणावळींशिवाय शेट्टी यांचा विजय
By Admin | Updated: May 18, 2014 00:45 IST2014-05-18T00:42:22+5:302014-05-18T00:45:21+5:30
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर दारू नाही की मांसाहारी सोडाच, शाकाहारी जेवणाचे एक ताटही कुठल्या कार्यकर्त्याला दिले नाही. मतांसाठी पैसे द्यायची तर बातच नाही.

दारू, जेवणावळींशिवाय शेट्टी यांचा विजय
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर दारू नाही की मांसाहारी सोडाच, शाकाहारी जेवणाचे एक ताटही कुठल्या कार्यकर्त्याला दिले नाही. मतांसाठी पैसे द्यायची तर बातच नाही. तरीही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेने खासदार राजू शेट्टी यांना तब्बल एक लाख ७७ हजार मतांनी दुसर्यांदा विजयी केले. उमेदवार चांगला असेल तर अन्य कोणतीही आमिषे दाखविली तरी लोक त्याच्याच पदरात आपल्या मताचे दान कसे टाकतात, याचे हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मीळ उदाहरण... आणि ते एकदाच घडलेले नाही. सलग चौथ्यांदा हा अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे. किंबहुना हीच त्यांची निवडणुकीची पात्रता ठरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक असलेले खासदार शेट्टी लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्यांदा उभे होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात होते. पैशापासून यंत्रणेपर्यंत कोणत्याही टप्प्यावर वरचढ ठरणारा उमेदवार विरोधात असूनही शेट्टी यांना लोकांनी ऊस आंदोलनाच्या चळवळीबद्दलची कृतज्ञता म्हणून निवडून दिले, हे शंभर टक्के खरे असले तरी त्यामध्ये शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य, घरदार सोडून ते शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी करीत असलेला संघर्ष व सामान्य जनतेशी असलेले त्यांचे अकृत्रिम नाते या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. दारू व जेवणावळी न घालता या निवडणुकीत मेधा पाटकर, सुभाष वारे, सदाभाऊ खोत, बी. जी. कोळसे-पाटील यांसारखे आणखीही काही चांगले उमेदवार रिंगणात जरुर होते परंतु त्यांना विजयापर्यंत जाता आले नाही. शेट्टी यांनी गेल्या पंधरा वर्षांत चार निवडणुका लढवल्या व त्या सर्वही स्पष्ट बहुमताने जिंकल्या. पहिली निवडणूक ते जिल्हा परिषदेच्या उदगाव मतदारसंघातून लढले. त्यानंतर २००४ची विधानसभा निवडणूक शिरोळ मतदारसंघातून ते विजयी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचा तब्बल ९५ हजार मतांनी पराभव केला. या सगळ्या निवडणुकीत त्यांना जनतेने ‘एक व्होट... एक नोट’ दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्याकडे ३५ हजार शिल्लक राहिले. विधानसभेला दोन-अडीच लाख, गत लोकसभा निवडणुकीत पाच, तर यंदाच्या निवडणुकीत दहा लाखांहून अधिक रक्कम शिल्लक राहिली आहे. शेट्टी यांच्या कामाची आता राज्यभर ओळख निर्माण झाल्याने यंदा सगळीकडून निधी आला. त्यातून शेट्टी व संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला. तुम्ही किती कार्यकर्त्यांना हॉटेलात जेवण दिले असे विचारल्यावर शेट्टी गमतीने म्हणाले, ‘अहो, त्यांना जेवण द्यायचे सोडा; उलट मीच लोकांचे खाल्ले. निवडणुकीच्या काळात फार क्वचितच मी घरी जेवायला गेलो. ज्या गावात सभा असेल तिथेच कार्यकर्त्यांच्या घरी जेवत असे. मी शाकाहारी असल्याने कार्यकर्ते हौसेने गोडधोड करून आग्रहाने खाऊ घालतात; त्यामुळे माझे शारीरिक वजन वाढले आहेच; परंतु त्यांच्यामुळेच माझे राजकीय वजनही वाढले, याची जाणीव मला आहे. त्यांनी जेऊ घातलेल्या अन्नाच्या घासाशी व दिलेल्या एक रुपयाशी प्रतारणा होईल असे वर्तन माझ्याकडून कधीच होणार नाही. हा विश्वास हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे.’