शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू : आठवले
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:38+5:302016-06-07T07:39:38+5:30
केंद्रात मंत्रिपद हवे : मुंबई महापालिकेत आघाडीसाठी प्रयत्नशील

शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू : आठवले
कोल्हापूर : केंद्रात एक मंत्रिपद व राज्यात विधान परिषदेच्या दोन जागा न मिळाल्यास पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू, असा गर्भित इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. ‘वैचारिक संवाद’ परिषदेसाठी ते येथे आले होते. मुंबई पालिकेत सेना, भाजपसह रिपब्लिकन पक्षाने आघाडी करून निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद, दोन विधान परिषदेच्या जागा देण्याचे मान्य केले होते. परंतु, अद्यापही त्यांनी ही मागणी पूर्ण केलेली नाही. केंद सरकारने दलितांचे काही प्रश्न सोडविले. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून एका कार्यक्रमात बसले होते. त्याची दखल घेऊन भाजपने खोत यांना विधान परिषदेचे आमदार केले; पण रिपब्लिकन पक्षाला आमदारकी दिली नाही. खोत जर अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील, तर माझी ताकद शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची आहे. त्यामुळे भाजपने आमची दखल न घेतल्यास तो ही मार्ग आम्हाला खुला आहे, असे आठवले यांनी ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी)
अयोध्येतील राम मंदिरास विरोध
अयोध्येत राम मंदिर बांधण्यास आपल्या पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘मंदिर बांधणार असाल तर तिथे बुद्ध मंदिर व मशीदही बांधावी, असा आमचा आग्रह आहे. शालेय अभ्यासक्रमात भाजप सरकारकडून जे भगवेकरण सुरू आहे, त्यालाही आमचा विरोध आहे. कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
खडसे यांची पाठराखण...
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे माझे मत होते; पण त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. उलट, माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते हेच भ्रष्टाचारी असतात, असे आठवले यांनी सांगितले.
प्रभाग निश्चितीला विरोध...
नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आपला विरोध आहे. शिवसेना-भाजपची मतदारांची संख्या महानगरांत जास्त आहे. त्यामुळे त्यांनाच याचा फायदा होईल. छोट्या पक्षांना त्यांचा कोणता फायदा नसून, छोट्या पक्षांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे आठवले म्हणाले.