शाहू कारखाना बिनविरोधच्या मार्गावर
By Admin | Updated: September 6, 2016 23:48 IST2016-09-06T23:41:39+5:302016-09-06T23:48:26+5:30
पंचवार्षिक निवडणूक : शाहू पॅनेलची १५ नावे जाहीर; आज अर्ज माघारीची अंतिम तारीख

शाहू कारखाना बिनविरोधच्या मार्गावर
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जवळपास बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून, १५ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. या १५ जागा स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलने अधिकृत केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज, बुधवारी अंतिम तारीख आहे. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी १५ जणांची यादी जाहीर केली.
सत्ताधारी स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू पॅनेलचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे - श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे (महिला गट), समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (कागल), वीरकुमार आप्पासो पाटील (कोगनोळी, ता. चिकोडी), अमरसिंह गोपाळराव घोरपडे (माद्याळ), यशवंत जयवंत माने (कागल), युवराज अर्जुनराव पाटील (मौ. सांगाव), धनंजय सदाशिव पाटील (केनवडे), बाबूराव ज्ञानू पाटील (गोकुळ शिरगाव), भूपाल विष्णू पाटील (कोगील बुद्रुक), मारुती दादू निगवे (नंदगाव), सचिन सदाशिव मगदूम (पिंपळगाव खुर्द, सर्व ऊस उत्पादक गट), रुक्मिणी बंडा पाटील (दिंडनेर्ली, महिला गट), तुकाराम अमृता कांबळे (व्हन्नूर, मागासवर्गीय राखीव गट).
मंगळवारअखेर जे १७ अर्ज शिल्लक आहेत, त्यामधील ही १५ नावे आहेत. दोन उमेदवारांचे ऊस उत्पादक गटातून अर्ज शिल्लक आहेत. हे दोघे आज माघार घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. ९) अधिकृतपणे आता बिनविरोध झालेल्या १३ जागांसह एकूण १५ जागा बिनविरोध झाल्याची घोषणा केली जाईल. (प्रतिनिधी)
परंपरा जपण्याचा प्रयत्न : समरजितसिंह
कागल : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एक-दोघांचा अपवाद वगळता सर्वांनी बिनशर्त माघार घेऊन स्वर्गीय राजेंच्या पश्चातही बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे उद्गार समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत काढले.
स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलच्या अधिकृत १५ जणांच्या उमेदवारीची यादी त्यांनी जाहीर केली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वीरकुमार पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांच्या यादीचे वाचन वीरकुमार पाटील यांनी केले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल तालुक्यातीलच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातून शाहू साखर कारखाना बिनविरोध करावा, यासाठी विविध नेतेमंडळींनी आवाहन केले. पाठिंबा मागण्यासाठी मी फोन करणार होतो, त्यापूर्वीच या सर्वांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याची सुरुवात तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. त्यानंतर संजयदादा मंडलिक, बाबासाहेब पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. तालुक्याबाहेरही आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव पाटील, संग्रामसिंह नलवडे, आदींनीही असे आवाहन केले. सोमवारपर्यंत नऊ अपक्षांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी ७ अर्ज माघार घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न केले, तर खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांनीदेखील फोनवर संपर्क साधत पाठिंबा व्यक्त केला आहे.
चिकोडी तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी हीच भूमिका घेतल्याने आता बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अजून दोघांचे अर्ज शिल्लक आहेत, पण तेदेखील माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. (प्रतिनिधी)
नव्या-जुन्यांचा मेळ
सत्ताधारी गटाच्या पॅनेलची घोषणा म्हणजे नूतन संचालकांचीच घोषणा असल्याने पत्रकार परिषदेच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसह कागल, करवीर, चिकोडी (कर्नाटक) तालुक्यांतही उमेदवारांच्या यादीबद्दल उत्सुकता होती. मात्र, समरजितसिंह घाटगे यांनी नव्या-जुन्यांचा सुरेख मेळ घातला आहे. सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देत सात नवे चेहरे घेतले आहेत, तर पाच वर्षांच्या खंडानंतर मारुती ज्ञानदेव पाटील यांना संधी दिली आहे. करवीरमधील चारही चेहरे बदलण्यात आले आहेत.