भामट्यांच्या शोधासाठी आंध्र प्रदेशला पथक रवाना

By Admin | Updated: August 25, 2015 00:25 IST2015-08-25T00:24:18+5:302015-08-25T00:25:29+5:30

एसएमएसद्वारे फसवणूक प्रकरण : दिवसभर गुंतवणूकदारांची पोलीस ठाण्यात वर्दळ

For the search of beats, the team leaves for Andhra Pradesh | भामट्यांच्या शोधासाठी आंध्र प्रदेशला पथक रवाना

भामट्यांच्या शोधासाठी आंध्र प्रदेशला पथक रवाना

कोल्हापूर : मोबाईल एसएमएसद्वारे कंपन्यांची आॅनलाईन जाहिरात करण्यासाठी दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या शोधासाठी सोमवारी आंध्र प्रदेशला पथक रवाना झाले. संशयित आरोपी संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे (सर्व रा. सेंट मेरी रोड, पेराम्बूर, चेन्नई) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून त्यांचे वास्तव आंध्र प्रदेशमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, गुंतविलेल्या पैशांचे पुरावे सादर करण्यासाठी सोमवारी दिवसभर गुंतवणूकदारांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्दळ सुरू होती. गुंतवणूकदारांची संख्या दीड हजारपेक्षा जास्त असल्याने याठिकाणी तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
संदीप रेड्डी, वेलकृष्णन, चैतन्य, कुमार पांडे या चौघांनी तीन महिन्यांपूर्वी न्यू शाहूपुरी परिसरातील शारदा चेंबर्समध्ये ‘व्हीजन मीडिया आयटी सोल्युशन फर्म’ नावाने कंपनी सुरू केली होती. जगभरातील १९ कंपन्यांचे आॅनलाईन जाहिरातीचे टेंडर घेतल्याचे सांगून त्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील गुंतवणूकदारांना १५ दिवसांत दामदुप्पट पैसे मिळविण्याची भुरळ घालून त्यांच्याकडून एसएमएसच्या नावाखाली पैसे गोळा करून शनिवारी रात्री कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार बाबासाहेब नारायण निवळे (वय ३५, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) यांनी आपली पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी या चौघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सोमवारी फसवणूक झालेल्या शंभरपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी पैसे जमा केलेल्या पावत्या पोलिसांकडे जमा केल्या. यावेळी पाच हजारपासून २५ लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये काही एजन्सीधारकांचा समावेश आहे. फसवणूक प्रकरणात महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आॅनलाईन एसएमएस पाठवण्याचे काम कोणत्याही नेट कॅफेमधून करता येत असल्याने अनेकांनी त्यामध्ये पैसे गुंतविले. सुरुवातीस तीन ते चार हप्त्यांमध्ये दामदुप्पट पैसे मिळू लागल्याने पैशाच्या हव्यासापोटी गुंतवणूक केल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Web Title: For the search of beats, the team leaves for Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.