शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:43+5:302021-09-10T04:29:43+5:30
जिल्ह्यात दि. १५ जुलैपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू झाले. सुरू होणाऱ्या शाळांची संख्या ...

शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
जिल्ह्यात दि. १५ जुलैपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू झाले. सुरू होणाऱ्या शाळांची संख्या दिवसागणिक वाढली. सध्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे सातशे शाळा सुरू झाल्या आहेत. शहरातील काही शाळांची घंटा वाजली आहे. ग्रामीण भागात काही गावांमध्ये पाचवी ते सातवीपासूनचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झालेले असतानादेखील ग्राम कोरोना समिती परवानगी देत नसल्याने काही ठिकाणी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत.
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली : ५५,३०१
दुसरी : ५७,४५२
तिसरी : ५७,६०९
चौथी : ५७,८३४
पाचवी : ५७,८४१
सहावी : ५७,३९५
सातवी : ५८,३२०
आठवी : ५८,८००
नववी : ६०,२२६
दहावी : ५६,७४५
जिल्ह्यात ७०० शाळा सुरू
जिल्ह्यात ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या ७०० माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक शाळा सुरू झाल्या नसल्या, तरी समूह अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शाळांना वेतनोत्तर अनुदान मिळत नाही. कोरोनाच्या सद्य:स्थितीत शाळांमधील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. पण, त्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे सॅनिटायझेशनचे पैसे देणार कोण, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनांसमोर निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापकांसमोर पेच
शाळा सुरू करण्याबाबत पालकांची संमतीपत्रे आणि ग्राम कोरोना समितीची परवानगी घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. मात्र, त्याबाबतचा लेखी आदेश दिलेला नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी ग्राम कोरोना समिती शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी देत नाही. शिक्षण विभागाच्या निव्वळ सूचनेमुळे मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी राज्य शासन आणि शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत ग्राम समिती आणि शाळा व्यवस्थापनाला अधिकृत पत्राद्वारे आदेश देण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी केली.
शिक्षणाधिकारी काय म्हणतात?
शासन आदेशानुसार प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्याबाबत जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत सातशे शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. शहरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.