साताऱ्याच्या खेळाडूंची सातासमुद्रापार भरारी...

By Admin | Updated: December 28, 2016 00:48 IST2016-12-28T00:48:19+5:302016-12-28T00:48:19+5:30

अविस्मरणीय कामगिरी : करिअरसाठी युवकांची क्रीडा क्षेत्राला पसंती

Satara players' strike | साताऱ्याच्या खेळाडूंची सातासमुद्रापार भरारी...

साताऱ्याच्या खेळाडूंची सातासमुद्रापार भरारी...

विकी जाधव --सातारा --राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत साताऱ्याचे नाव जसे सातासमुद्रापार पोहोचले तसेच साताऱ्याची शान असलेले क्रीडा क्षेत्र सुद्धा आज मागे राहिले नाही. या क्षेत्रात साताऱ्याच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. खेळाडूंच्या या अतुलनीय कामगिरीमुळे आज जिल्ह्यातील हजारो युवकांना करिअरसाठी क्रीडा क्षेत्र खुणावू लागले आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक नवनवीन बदल होत असून, खेळाडूंसाठी हे वर्ष अविस्मरणीय असेच ठरले आहे.
२०१६ हे वर्ष सातारा जिल्ह्यासाठी तसे चांगले गेले. क्रीडा क्षेत्रात अनेक प्रकारांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी नावीन्यपूर्ण यश मिळवलं. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत ‘सातारा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोही (ता. माण) येथील ललिता बाबर हिने जिल्ह्याचे नाव खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचविले. ‘स्टिपलचेस’ प्रकारात तिने थेट पात्रता फेरीतून थेट अंतिम फेरीत धडक मारली. असा पराक्रम करणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली. अंतिम फेरीत जरी तिला अपयश मिळाले असले तरी तिने केलेली कामगिरी ही खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी साताऱ्यातील खेळाडंूनी चमकदार कामगिरी केली. सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडू आज मल्लखांब, कुस्ती, क्रिकेट, शूटिंग, कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारांतून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत आहेत.
त्यामुळे अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे जिल्ह्यात आयोजन केले जात आहे. एकूणच यंदाचे वर्ष हे क्रीडा क्षेत्रासाठी व खेळाडूंसाठी आदर्शवत असेच ठरले.


कारीचा मल्लखांब खेळाडूंना पर्वणी
कारीच्या मल्लखांबाची सुरुवात पेशव्यांच्या काळात झाली. तेव्हापासून हा क्रीडा प्रकार लोकप्रिय होत गेला. आजपर्यंत अनेक कुस्ती पैलवानांनी कारी येथे येऊन मल्लखांबाचे धडे गिरविले आहेत आणि आजही गिरवत आहेत. सातारा जिल्ह्यासाठी ‘कारीचा मल्लखांब’ म्हणजे एक प्रकारचे वरदानच लाभले आहे. मल्लखांब क्रीडाप्रकारात बाळभट्ट देवधर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. खांब आणि दोरीवर मल्लखांब केला जातो. कारीतून हजारो खेळाडंूनी मल्लखांब क्रीडा प्रकारातून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.


खेळाडूंच्या अविस्मरणीय घडामोडी...
‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबरची ‘रिओ आॅलिम्पिक’मध्ये कामगिरी
कारी येथील खेळाडूंचे मल्लखांब क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश
समीर चिने यांची कबड्डी क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
धावपटू भैरव यादव याची सलग चारवेळा राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी
रोहिणी मोरे (पॉवर लिफ्टिंग), अभिषेक मोहिते (बॅडमिंटन), तेजस सकपाळ (क्रिकेट), मयूर घोरपडे (कबड्डी) यांची क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
मूलभूत सुविधांची गरज..
सातारा जिल्ह्यातील खेळाडू आज क्रीडा क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने पाहत आहेत. मात्र, या क्षेत्रात करिअर करताना मूलभूत सुविधा, मार्गदर्शनाचा अभाव अशा अनेक समस्या युवकांना सतावत आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंच्या अतुलनीय कामगिरीने जिल्ह्याचे नाव आज अभिमानाने घेतले जात आहे. असे असले तरी या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद केल्यास खेळाडूंसाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत खेळाडूंनी व्यक्त केले.

खेळाडूने आवड असलेल्या क्षेत्रातच करिअर करणे गरजेचे आहे. खेळाडूच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही यश खेळाडूपासून दुरावू शकत नाही. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा असेल तर कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागेल. योग्य मार्गदर्शन मिळाले तर खेळाडू आपले ध्येय निश्चित गाठू शकतील.
- माया पवार,
मल्लखांब खेळाडू

Web Title: Satara players' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.