न झालेल्या सत्काराची खासदारांना सल
By Admin | Updated: June 11, 2016 00:29 IST2016-06-11T00:11:50+5:302016-06-11T00:29:59+5:30
राष्ट्रवादीचा वर्धापनदिन : कार्यक्रमात महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

न झालेल्या सत्काराची खासदारांना सल
कोल्हापूर : देशभरात साडेपाचशेहून अधिक खासदारांमध्ये टॉप थ्री क्रमांक पटकाविल्याने दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी आपला गौरव झाला; पण मतदारसंघात साधी दखलही घेतली नसल्याची सल खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखविली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केली; पण सर्वच वक्त्यांनी महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला.
संसदेत उभे राहून प्रश्न उपस्थित करणे एवढे सोपे नसल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, महाडिक यांचे अभ्यासपूर्ण प्रश्न व प्रश्नांविषयीची आपुलकी पाहून पक्षातील कार्यकर्त्यांचा ऊर भरून येतो. बास्केट पूल, कोकण रेल्वेबाबत त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादीचे खासदार पहिल्या तीनमध्ये येतात, याचा आम्हाला अभिमान आहे. आगामी काळात केंद्र अथवा राज्य पातळीवरील नेत्यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बास्केट पूल म्हणजे काय ते समजावून सांगा, असा टोला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी हाणला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २५ जून रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंगणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार महाडिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षाच्या उमेदवारांना ताकद द्यावी, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका केली. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, राष्ट्रवादीचे खजानिस अरुण इंगवले, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रोहित पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यास मित्रपक्षाशी युतीचा विचार केला जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवणारच असा निर्धार ए. वाय. पाटील यांनी केला.
चार-पाच महिन्यांत राजकीय भूकंप
भाजपचे द्वेषाचे राजकारण सुरू असून मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महाडिक यांनी केले.