ऊसतोडणीची खुशाली झाली खंडणी!

By Admin | Updated: December 19, 2014 23:32 IST2014-12-19T21:34:19+5:302014-12-19T23:32:31+5:30

ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल : स्लीपबॉय-ऊसतोडणी मजुरांची मिलीभगत$$्नि

The rumor of the enthusiasm! | ऊसतोडणीची खुशाली झाली खंडणी!

ऊसतोडणीची खुशाली झाली खंडणी!

राजाराम लोंढे -कोल्हापूर आपल्या संपूर्ण उसाची तोड केली म्हणून पूर्वी शेतकरी ऊसतोडणी मजुरांना ‘खुशाली’ देत होता; पण आता ‘खुशाली’ बाजूला जाऊन मजुरांनी ‘खंडणी’चा प्रकार सुरू केल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दहा टन ऊस बाहेर काढण्यासाठी दोन टन उसाच्या पैशांची मागणी तोडणी मजुरांकडून केली जात आहे. त्यामध्ये कारखान्याचे स्लीपबॉय व तोडणी मजुरांची मिलिभगत असल्याने थेट पैसे मागण्याचे धाडस होते.
पूर्वी शेतकरी आपला ऊस तोडल्याबद्दल स्वखुशीने तोडणी मजुरांना कुवतीप्रमाणे पैसे देत होते. पण, अलीकडे तोडणी मजूर कमालीचे निर्ढावलेले आहेत. अगोदरच विविध कारणाने ऊस उत्पादक शेतकरी अचडणीत सापडलेले आहेत. रात्री-अपरात्री जिवाची पर्वा न करता उसाला पाणी पाजावे लागते, अशी अनेक अग्निदिव्य पार करीत अठरा महिने पोटच्या पोराप्रमाणे उसाची जपणूक करायची आणि साखर कारखान्याच्या तोडणीची वाट बघत बसायची. गट आॅफिसवर दहा-पंधरा हेलपाटे मारल्यानंतर तोडणी मिळते. ऊस तोडणीची पावती घेऊन शेतकऱ्यांच्या दारात जाण्याअगोदरच तोडणी व ओढणीचे किती पैसे देणार, याची विचारणा केली जाते. त्या प्लॉटमध्ये किती ऊस आहे, त्यापेक्षा ते किती क्षेत्र आहे, प्लॉटपासून ट्रॅक्टर किती अंतरावर भरावा लागणार यावरच पैशांचा हिशेब तोडणी मजुरांकडून सांगितला जातो. सात टन ऊस ओढणीसाठी तब्बल तीन हजारांची मागणी तोडणी मजुरांकडून केली जाते. त्यामुळे ‘तोडणी नको, पण तोडणी मजुरांना आवरा’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांनी स्लीपबॉय व शेती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर तेही मजुरांचे समर्थनच करतात. पैसे नाही द्यायचे, तर कारखान्याचा पट्टा पडतानाच ऊस जाणार, तोपर्यंत वजनात घट होऊन मोठे नुकसान होणार असल्याने पैसे देऊया, पण ऊस जाऊ दे, अशी मानसिकता शेतकऱ्यांची होते.


ऊस अडीच रुपये किलो !
सर्वांत स्वस्त शेती माल कोणता असेल, तर तो ऊस आहे. अठरा महिन्यांनंतर त्याची उधारीवर विक्री करायची आणि त्याला मिळणारा दरही बेभरवशाचा आहे. अनेकजण साखर व ऊसदराला जरा चांगला दर मिळाला की, ओरड सुरू करतात, पण उसाला किलोचा दर केवळ अडीच रुपये मिळतो. यापेक्षा महिन्यात काढणीस येणारी भाजीची पेंडी वीस रुपयांनी विकली जाते. याचा कोण विचार करणार का ?


कारखानदारही हतबल
कारखाना सुरू झाल्यापासून शेतकरी ऊसतोडणीची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. तोडणी मजुरांची टंचाई असल्याने कारखानदारही हतबल असतात. त्याचा गैरफायदा घेत तोडणी मजूर शेतकऱ्यांना नागवतो.


सव्वादोनशे रुपये तोडणी देऊनही...
साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसदरातून तोडणी प्रतिटन २२५ रुपये, तर वाहतूक २७० रुपये असे टनाला पाचशे रुपये घेतात. याशिवाय तोडणी मजूर प्रतिटन शंभर ते दोनशे रुपये उकळतात. याबाबत शेतकरी अनेकवेळा कारखान्याच्या शेती विभागाकडे ओरड करतात, पण या विभागातील कर्मचारीच सामील असल्याने लक्ष देणार तरी कोण ?

बांधाला ट्रॉली
तरीही पैसे !
अनेक प्लॉटच्या बांधाला ट्रॉली लागते. येथील ऊस तोडण्यासाठी मजूर पैशांची अपेक्षा करतात. शेतकऱ्यांनी नाही म्हटले, तरी किमान जेवणापुरते तरी पैसे देण्याचा आग्रह धरला जातो. हे घेतल्याशिवाय ‘कंत्राटदार’ (टोळीचा म्होरक्या) कोयताच लावत नाही.


शेतकऱ्यांनी संघटितपणे यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. काही ठिकाणी ऊस घालविण्याची गडबड असते, त्याचा फायदा मजूर उचलतात. त्याचबरोबर कारखाना व्यवस्थापनाने यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- अरुण देसाई (तेरणी, गडहिंग्लज)


तोडणी मजुरांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर मजुरांच्या बिलातून रक्कम कपात करण्यास आम्ही सांगितलेले आहे; पण यावर कारखान्यांचा अंकुश असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची पैशांसाठी कोणी अडवणूक करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याला संघटनेची सहमती असेल.
- प्रा. डॉ. सुभाष जाधव (सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी-वाहतूक संघटना)

Web Title: The rumor of the enthusiasm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.