‘रुईकर कॉलनी’मध्ये रंगलय हायटेक वॉर
By Admin | Updated: October 26, 2015 00:31 IST2015-10-26T00:30:39+5:302015-10-26T00:31:27+5:30
सोशल मीडियावर प्रचाराला वेग : नवोदित उमेदवारांमुळे प्रचारात उत्साह

‘रुईकर कॉलनी’मध्ये रंगलय हायटेक वॉर
कोल्हापूर : विकासकामांबाबत विविध बक्षिसे, पारितोषिक मिळविलेला आणि बहुतांश सुशिक्षित मतदार असणाऱ्या रुईकर कॉलनी प्रभागात चौरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी रिंगणात उतरविलेले उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे प्रचारात त्यांचा मोठा उत्साह दिसत आहे. उमेदवारांच्या गाठीभेटींसह सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे.
‘राष्ट्रवादी’चे विद्यमान नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पत्नी जयश्री या राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवार आहेत. हिंद महिला मंडळ, हिरकणी महिला बचतगटाद्वारे या प्रभागात कार्यरत असलेल्या जयश्री या पती प्रकाश यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. काँग्रेसकडून शैला चव्हाण लढत आहेत. प्रियदर्शनी महिला नागरी पतसंस्था, सीमंतिनी मराठा महिला मंडळ, सहेली मंचच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या चव्हाण या प्रभागातील मतदारांना परिवर्तनाची साद घालत आहेत. त्यांचे पती प्रदीप हे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आहेत. शिवनेरी फुटबॉल संघाचे अध्यक्ष असलेला त्यांचा मुलगा महेंद्र यांचा संपर्क हा शैला चव्हाण यांच्यासाठी अधिकचा मुद्दा ठरत आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून उमा इंगळे या रिंंगणात उतरल्या आहेत. भागीरथी महिला संस्थेद्वारे त्या प्रभागात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रचारात आमदार अमल महाडिक यांनी ताकद लावली आहे. शिवाय विद्यमान नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यावर नाराज असलेले हिंद को-आॅपरेटिव्ह हौसिंगमधील काही संचालक इंगळे यांच्या बाजूने उभारले आहेत. रमेश बुलबुले यांची सून जान्हवी या शिवसेनेकडून लढत आहेत. त्यांना आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माधुरी पडवळे या अपक्ष म्हणून नशीब अजमावीत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचे कुटुंबीय, काही समर्थक हिंद को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीशी संबंधित आहेत. या सोसायटीतील अंतर्गत राजकारणाचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे.
अन्य प्रभागांप्रमाणे ‘रुईकर कॉलनी’मध्ये प्रचाराचा गोंगाट, दंगा दिसत नाही. पदयात्रा, ‘होम टू होम कॅम्पेन’ अशा पद्धतीने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. वैयक्तिक गाठीभेटी आणि सोशल मीडियाद्वारे प्रचाराने या ठिकाणी वेग घेतला आहे. सुशिक्षित आणि युवा मतदारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे सोशल मीडियातील प्रचार जास्त परिणामकारक ठरत आहे. याच्या माध्यमातून उमेदवारांकडून भूमिका मांडली जात आहेत.