बिरंजे यांचा योग्य निर्णय

By Admin | Updated: January 10, 2015 00:20 IST2015-01-09T23:36:59+5:302015-01-10T00:20:14+5:30

राजू शेट्टी : इचलकरंजी नगराध्यक्षांच्या बंडास पाठिंबा

The right decision of Birnje | बिरंजे यांचा योग्य निर्णय

बिरंजे यांचा योग्य निर्णय

इचलकरंजी : पूर्वीच्या आघाडी सरकारने दोन्ही कॉँग्रेसची सत्ता असलेल्या नगरपालिकांना विकास निधी दिला. आता राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारचे तेच धोरण असून, भाजपप्रणीत सरकारसुद्धा विकास करताना आपल्याच विचारांच्या नगरपालिकांना निधी देणार आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.नगराध्यक्षा बिरंजे यांनी केलेल्या बंडास शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देत त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी बोलताना शेट्टी यांनी बिरंजे यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले, इचलकरंजीसाठी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणाऱ्या योजनेसाठी आमदार सुरेश हाळवणकर आणि मी स्वत: राज्य व केंद्र सरकारकडे विशेष प्रयत्न करू. तसेच पालिकेचे आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी निधी आणला जाईल. विकासासाठी राजकारणविरहित कामे करू.
आपल्या भाषणात नगराध्यक्षा बिरंजे यांनी, आपण कॉँग्रेसचीच असल्याचा पुनरुच्चार केला व त्या म्हणाल्या, इचलकरंजीचा विकास हेच माझे ध्येय आहे. खासदार शेट्टी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी स्वागत केले. रवी रजपुते, ‘शविआ’चे कार्याध्यक्ष जयवंत लायकर, गटनेते महादेव गौड, निमंत्रक तानाजी पोवार, सुजाता भोंगाळे, प्रमिला जावळे, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)

सत्तांतर
नव्हे सहमतीकरण
कार्यक्रम सुरू असताना ‘शविआ’चे नगरसेवक तानाजी पोवार यांनी नगरपालिकेत सत्तांतर झाल्याची शेरेबाजी केली. त्याला झटकन उत्तर देताना कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते म्हणाले, सत्तांतर कसे म्हणता, कारण नगराध्यक्षांनी स्पष्ट सांगितले की, त्या कॉँग्रेसच्याच आहेत. त्यावर बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तांतर नव्हे, ‘सहमतीकरण’ असे म्हणूया.


नगराध्यक्षांचे बंडाचे निशाण कायम
मी कॉँग्रेसचीच नगराध्यक्षा आहे. मला मिळालेला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करीत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी बंडाचे निशाण कायमपणे फडकवित ठेवले आहे.
नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंडाचे निशाण रोवले. त्यांना शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला, तर कॉँग्रेसमधील काही नगरसेवकांना फुटीरतेची बाधा होऊ लागली.
गुरुवारी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी कॉँग्रेसच्या सर्व नगरसेवक, नगरसेविकांची बैठक घेतली. बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, नगराध्यक्षा बिरंजे यांच्याशी समन्वय साधण्यासाठी सर्व अधिकार सतीश डाळ्या यांना दिल्याचा निर्णय घोषित केला.
आज, शुक्रवारी नगराध्यक्षा बिरंजे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, सतीश डाळ्या यांचा मला दूरध्वनी आला होता; मात्र त्यांना आपण राजीनामा देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे, अशी माहिती पत्रकारांना दिली.

Web Title: The right decision of Birnje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.