‘महसूल’चे कामकाज ठप्प
By Admin | Updated: July 31, 2015 00:55 IST2015-07-31T00:55:06+5:302015-07-31T00:55:06+5:30
कार्यालयांमध्ये शुकशुकाट : निलंबित लिपिकास कामावर घेण्यासाठी कर्मचारी आजपासून काळ्या फिती लावणार

‘महसूल’चे कामकाज ठप्प
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील निलंबित लिपिकास तातडीने कामावर हजर करून घ्यावे, या मागणीसाठी गुरुवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची सामुदायिक रजा घेऊन कामकाज बंद पाडले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयांसह तहसीलदार, प्रांत कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. आज, शुक्रवारपासून सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार असून जर निलंबन मागे घेतले नाही तर १६ आॅगस्टपासून ‘बेमुदत संप’ करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी १३ जुलैला सुशांत पाटील या लिपिकास टंचाईग्रस्त गावांचा अहवाल वेळेत पूर्ण केला नाही म्हणून तडकाफडकी निलंबित केले होते. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध राज्य कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा आदेश दिला होता.
त्यानुसार जिल्ह्णातील महसूल विभागामधील सुमारे ५६८ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सामुदायिक रजा घेऊन आंदोलन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक, कौटुंबीक कारण देत या रजा काढल्या होत्या.
या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय, सहा प्रांत, बारा तहसीलदार कार्यालये, पुनर्वसन, अन्नधान्य वितरण, युएलसी, संजय गांधी योजना आदी विभागांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे नेहमी गर्दीने फुलणाऱ्या या कार्यालयात गुरुवारी दिवसभर शुकशुकाट होता. नागरिक कामानिमित्त कार्यालयात यायचे परंतु तेथे कर्मचारीच नसल्याचे पाहून परत निघून जात होते.
सर्व कार्यालयात फक्त अधिकारीच उपस्थित होते. त्यांच्या मदतीला कोतवाल, तलाठी देण्यात आले होते. त्यामुळे कशीबशी कार्यालये उघडली होती. हाताखालील कर्मचारी नसल्याने अधिकारीही निवांत बसून होते.
दरम्यान, सामुदायिक रजा आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी महावीर उद्यानात जमले. त्याठिकाणी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, रा. सू. गवई आणि पंजाबमधील अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर झालेल्या सभेत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विलासराव कुरणे, प्रवीण माने, बबन शिंदे, रसिका कडोलीकर,अविनाश सूर्यवंशी, आर. आर. पाटील, विनायक लुगडे, अजित पाटील, ट्रेझरी संघटनेचे ब्रह्मपुरे, प्राथमिक शिक्षक समितीचे सावंत आदींची भाषणे झाली.
जोपर्यंत जिल्हाधिकारी निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा तर १६ आॅगस्टपासून ‘बेमुदत संप’ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या या मुद्यावर भावना तीव्र आहेत.
जिल्हाधिकारी दुपारनंतर कार्यालयात
जिल्हाधिकारी डॉ. सैनी सकाळी कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यांनी दुपारी तीननंतर येणेच पसंत केले. त्यांच्या कार्यालयात फक्त एक स्वीय सहायकवगळता सर्व कर्मचारी रजेवर गेले होते. त्यामुळे देवस्थान समितीच्या दोन शिपायांची जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेमणूक केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी भेटायला काहीजण आले होते, परंतु ही भेट झाली नाही. महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक एलबीटीसंदर्भात मोर्चा घेऊन आले होते. त्यांनाही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन द्यावे लागले.
अधिकारी आले स्वत:च्या वाहनातून
आंदोलनात वाहनचालकही सहभागी होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना स्वत:च्या वाहनातून यावे लागले. तसेच त्यांच्या कार्यालयातील शिपाई नसल्यामुळे त्यांना काहीच कामकाज करता आले नाही, तसेच चहा आणण्यापासून सगळ्या अडचणी होत्या. दुपारीनंतर तर काही अधिकारी घरी निघून गेले, तर काहीजण एकमेकांशी गप्पा मारत बसल्याचे दिसून आले.
विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी : सैनी
कोल्हापूर : कर्मचाऱ्यास निलंबित करण्याची माझी कारवाई चुकीची आहे, असे कर्मचारी संघटनेस वाटत असेल तर त्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी. कारवाई कशी चुकीची आहे, हे त्यांना पटवून द्यावे आणि निलंबन रद्द करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कामात हयगय केल्यामुळे मी सुशांत पाटील यास निलंबित केले आहे. माझी कारवाई योग्य आणि कायदेशीर आहे. ती मी मागे घेऊ शकणार नाही. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्तांकडे जाऊन दाद मागावी. त्यांनी निलंबन रद्द केले तर माझी काहीच हरकत असणार नाही. परंतु, मीच ते निलंबन मागे घ्यावे असे म्हणणे चुकीचे आहे, असे सैनी म्हणाले.
संघटनेने मला टपालातून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून अनेकजण निवेदन देतात, त्यावेळी चर्चा करता येते. परंतु, जर टपालातून निवेदन दिले तर चर्चा कशी करणार? असा सवाल करीत सैनी म्हणाले, मी चर्चा करण्यास केव्हाही तयार आहे; पण माझ्यासमोर तरी ते आले पाहिजेत. मी त्यांना तारीख व वेळ देऊन चर्चेला बोलवावे, ही त्यांची भूमिका योग्य नाही. (प्रतिनिधी)