पूर्वीचेच रेखांकन कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:41+5:302021-04-04T04:23:41+5:30
कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते ...

पूर्वीचेच रेखांकन कायम करा
कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते प्रस्तावित केल्याने येथील पिकाऊ जमीन व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार आहे. यासाठी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेले पूर्वीचे रेखांकन कायम करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, २०१८ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनात बदल केल्यामुळे भुये आणि भुयेवाडी ग्रामस्थांची कसदार जमीन, स्थावर मालमत्तेबरोबर नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या चार पाच विहिरी कूपनलिका नष्ट होणार आहेत. यामुळे भविष्यात अनेक ग्रामस्थ भूमिहीन होणार आहेत.
गेली दोन वर्षे आम्ही याबाबत लढा देत आहोत. मात्र, याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. उलट छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वसंमतीने मंजूर रेखांकनाप्रमाणे रस्ता करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
तर निवडणुकांवर बहिष्कार
चौकट : अधिकारी छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घालत असून तो त्यांनी वेळीच थांबवावा. अन्यथा गोकुळच्या निवडणुकीत दोन गावच्या दूध संस्थांचे ठरावधारक वेगळा विचार करतील आणि पुढील निवडणुकीवरही बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा देव पाटील यांनी दिला. या निवेदनावर गोकुळचे ठरावधारक शिवाजी महादेव पाटील, अमित शिवकुमार पाटील, अश्विनी विकास पाटील, राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील, राजेंद्र स्वामी, शकुंतला स्वामी, माणिक स्वामी यांच्यासह ४०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
फोटो: ०३ भुयेवाडी निवेदन
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वीचे रेखांकन कायम ठेवा, अशी मागणी भुये, भुयेवाडीतील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.