विधानसभेला ‘लोकसभे’ची पुनरावृत्ती
By Admin | Updated: May 24, 2014 01:01 IST2014-05-24T00:45:34+5:302014-05-24T01:01:57+5:30
राजू सावंत यांचा इशारा : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास वेगळे परिणाम

विधानसभेला ‘लोकसभे’ची पुनरावृत्ती
कोल्हापूर : महागाई, भ्रष्टाचारासह विविध कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. यामध्ये मराठा समाजाला दाखविलेले आरक्षणाचे गाजर हे प्रमुख कारण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी याबाबत निर्णय न घेतल्यास कॉँग्रेस आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज, शुक्रवारी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी दिला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य व केंद्र सरकारची महागाई कमी करण्याबाबतची उदासीनता, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारीचे मोठे प्रमाण, वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार याचबरोबर मराठा समाजाला आरक्षणाचे दाखविलेले गाजर, आदी कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची पीछेहाट झाली आहे. यातून मराठा समाजाचा रोष पत्करण्याची वेळ व ढग फाटल्यावर होणार्या अवस्थेसारखी परिस्थिती महाराष्ट्र सरकारवर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी योग्य तो बोध घेऊन शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गेली २५ ते ३० वर्षे महाराष्टÑातील बहुसंख्येने असलेला गरीब मराठा समाज लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करीत आहे; परंतु आयोग नेमणे, समाजाचा आर्थिक व सामाजिक सर्व्हे करणे, आरक्षण तत्त्वत: मान्य करणे, आदी अनेक कारणे समाजाला दाखविली आहेत. कोणा समाजावर अन्याय करून आम्हाला आरक्षण द्या, अशी कोणतीही मराठा समाजाच्या नेत्यांची भावना नाही. परंतु सरकार याविषयी चालढकल करत आहे. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या व आरक्षण चळवळीत सातत्याने पाठपुरावा करणार्या विविध संघटनांना आगामी काळात एकत्रित करून मराठा आरक्षण या एकाच जाहीरनाम्यावर उमेदवार उभे करण्यासाठी अत्यंत गांभीर्याने चाचपणी केली जाणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)