स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले

By Admin | Updated: January 23, 2015 23:34 IST2015-01-23T22:54:01+5:302015-01-23T23:34:40+5:30

शासनाचे दुर्लक्ष : प्रकाशन समितीचे पुनर्गठन नाही; भाजप सरकारचेही दुर्लक्ष

Release of freedom fighter's life story | स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले

स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले

प्रताप महाडिक- कडेगाव -महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाची समिती २०१३ पासून अद्याप पुनर्गठित झालेली नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी या स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले आहे. शिवाय राज्यातील २७ दिग्गज व्यक्तींचे जीवनचरित्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळापुढे धूळ खात पडून असल्याची माहिती मिळाली. २०१३ पूर्वी आघाडी शासनाच्या काळात अस्तित्वात असलेल्या मंडळाने हे प्रस्ताव प्रकाशनासाठी विचाराधीन ठेवले होते. परंतु आता नव्या भाजप शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
आघाडी शासन अस्तित्वात असताना म्हणजे आॅगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाची समिती बरखास्त करण्यात आली होती. ही समिती बरखास्त करण्यापूर्वी याच समितीने क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे जीवनचरित्र महाराष्ट्र साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या प्रकल्प समितीच्या बैठकीत प्रकाशनासाठी विचाराधीन ठेवले आहे. तेव्हापासून समिती पुनर्गठित झालेली नाही आणि जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले आहे.
क्रांतिअग्रणींचे जीवनचरित्र ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकांच्या मालिकेतून शासनामार्फत प्रसिध्द व्हावे, यासाठी वांगी येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख औंधे यांनी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला आहे. परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारात प्रकाशन अडकले आहे.
वास्तविक युती शासनाची सत्ता आल्यानंतर अशी महत्त्वपूर्ण कामे रखडणार नाहीत, अशी नागरिकांची अपेक्षा होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता संघर्ष या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्रातून नवीन पिढीसमोर येणार आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजप आणि शिवसेना युती शासनाने यातील गांभीर्य ओळखून ही समिती तात्काळ गठित करावी, जी. डी. बापू व नागनाथअण्णा यांची जीवनचरित्रे प्रकाशित करावीत, अशी समाजाच्या सर्वच स्तरातून मागणी होत आहे.


क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता युती शासनाने तरी डोळे उघडावेत, अन्यथा रस्त्यावर येऊन संघर्ष करू, मंत्र्यांना जाब विचारू.
- गोरख औंधे, सामाजिक कार्यकर्ते, वांगी (ता. कडेगाव)


क्रांतिअग्रणी व क्रांतिवीरांचे जीवनचरित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. महाविद्यालये आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचण्याची गरज आहे. शासनाने जीवनचरित्र प्रकाशनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
- अरुण लाड, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख, कुंडल

Web Title: Release of freedom fighter's life story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.