राज्य बँकेकडून साखर मूल्यांकन घटीचा विक्रम
By Admin | Updated: July 7, 2015 23:59 IST2015-07-07T23:59:31+5:302015-07-07T23:59:31+5:30
सलग आठव्यांदा घट : साखर कारखान्यांच्या कोट्यवधींच्या शेअर्स रकमेला राज्य बँकेकडून छदामही नाही

राज्य बँकेकडून साखर मूल्यांकन घटीचा विक्रम
कोपार्डे : जसजसे साखरेचे दर घसरू लागले तसे राज्य बँकेने आपले पतधोरणही बदलले असून,
साखर मूल्यांकन दर तीन महिन्यांनी जाहीर करण्याचा पायंडाच मोडल्याचे पहायला मिळत आहे. एक
महिन्यात बाजारातील साखरेच्या दराचे भांडवल करत तीनवेळा साखर मूल्यांकन घटवून साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणीत भर टाकली असल्याचे मत साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. सध्या साखरेच्या दराने गेल्या दोन वर्षांतील निच्चांक गाठला आहे. १९०० ते २००० रुपये एक्स फॅक्टरी दर प्रति क्विंटलवर आल्याने मोठी आर्थिक चणचण कारखानदारींसमोर निर्माण झाली आहे. बाजारात साखर उत्पादन खर्चाच्या किमान ६०० ते ७०० रुपये कमी दर मिळत असल्याने एफ.आर.पी. द्यायची कोठून हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.त्यातच राज्य बँकेकडून प्रतिक्विंटल साखर उत्पादनावर देण्यात येणाऱ्या कर्जाच्या उचलीत कमालीची घट करत आर्थिक हातोडा उगारला आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्य बँक प्रतिक्विंटल देत असलेली उचल २६३० रुपये होती. यावेळी साखरेची बाजारातील दराची घसरण सुरू झाली आहे. ती २००० रुपये प्रतिक्विंटल आल्याने २९ जून २०१५ मध्ये राज्य बँकेने प्रतिक्विंटल देत असलेल्या २१०० रुपये उचलीमध्ये १५० रुपये घट केली असून, ती १९५० वर आणली आहे. ही घट या हंगामातील आठव्यांदा असून, तो विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, अडचणीच्या काळात राज्य बँकेकडून मदतीची अपेक्षा साखर उद्योगाला होती. पूर्वहंगामी कर्ज देताना एकूण कर्जाच्या एक ते दीड टक्का रक्कम शेअर्स भांडवल म्हणून कपात करते. या शेअर्स भांडवलावर राज्य बँकेकडून २००४ पासून एक रुपयाही रिबेट अथवा व्याज दिलेले नाही. राज्यातील साखर कारखान्यांची ही शेअर्स ठेव राज्य बँकेकडे कोट्यवधीच्या घरात आहे. ही रक्कम राज्य बँक बिनव्याजी वापरत आहे. आमच्या शेअर्स भांडवलावर व्याज देत नसाल ती साखर उद्योग अडचणीत असताना परत करा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे.तीन महिन्यांनी बाजारातील सरासरी साखरेचा दर पाहून साखर मूल्यांकन जाहीर करण्याचा नियम आजपर्यंत होता, पण या हंगामात (२०१४-१५) तो धाब्यावर बसवून राज्य बँकेने दीड महिन्यात तीनवेळा साखर मूल्यांकनात घट केल्याने साखर उद्योगातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
१९५०च्या ८५ टक्के मिळणार उचल
राज्य बँकेने १९५० रुपये प्रतिक्विंटल उचल जाहीर केली असली तरी त्यांच्या ८५ टक्के म्हणजे १६५७ रुपये ५० पैसेच उपलब्ध होणार आहेत. यातील बँकेचे पूर्वीचे कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च यापोटी ७५० रुपये वजा करता म्हणजे ऊस दर देण्यासाठी केवळ ९७५ रुपये २५ पैसेच साखर कारखानदारांच्या हातात पडणार आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सरासरी एफआरपी २४०० ते २६०० रुपये असल्याने उर्वरित १७०० रुपये प्रतिटन कोठून उपलब्ध करायचे हा प्रश्न असताना कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.
साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंग
राज्य बँकेकडून साखर मूल्यांकनामध्ये सातवेळा घट करण्यात आली. एकाच हंगामात एवढ्यावेळा घट करण्याचा साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंग असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.