‘ग्राहक संरक्षण’ची पुनर्रचना
By Admin | Updated: December 19, 2014 23:53 IST2014-12-19T21:53:55+5:302014-12-19T23:53:34+5:30
सूर्यकांत गवळी : राज्यभरातील ग्राहक चळवळीबाबत माहिती

‘ग्राहक संरक्षण’ची पुनर्रचना
ओरोस : कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी आता ग्राहक संरक्षण कायद्याची पुनर्रचना होत आहे. राज्य सरकारही आता ग्राहक धोरण जाहीर करणार आहे. तर राज्यस्तरीय ग्राहक कल्याण सल्लागार समितीही आता दलाल हटाव मोहीम राबवून ग्राहक चळवळ सक्षम करणार असल्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.
राज्यभरातील ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांची जागरूकता व्हावी, त्यांची फसवणूक टाळावी व ग्राहकांचे फायदे त्यांना मिळावेत, यासाठी आता राज्यस्तरीय ग्राहक कल्याण सल्लागार समितीने काम सुरू केले आहे. आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यात दौरा करीत एक दिवस एक जिल्हा असा दौरा कार्यक्रम आहे.
यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच हा दौरा सुरू झाला आहे. १६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथून या दौऱ्यास प्रारंभ झाला असून १४ जानेवारी २०१५ रोजी हा दौरा औरंगाबाद येथे संपेल.
त्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन ग्राहक संरक्षण कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यात येईल व ग्राहक संरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या शिफारशीचा अहवाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल, अशीही माहिती सूर्यकांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे विविध टप्प्यांवर काम सुरू झाले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाच्या यंत्रणेसह खासगी व्यावसायिक यंत्रणांवर अंकुश राहण्यासाठी आता ग्राहक संरक्षण कायद्याची सरकार पुनर्रचना करीत आहे. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन ग्राहक धोरण जाहीर करावे. अन्न व नागरी पुरवठा विभागात समाविष्ट असलेले ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्र करावा.
२० टक्के निधी या विभागाला मिळावा. ग्राहक चळवळ ही थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर कार्यक्रम आखावेत व ग्राहक दिन साजरे करावेत. जिल्हा ग्राहक मंच आणखी सक्षम करून प्रत्येक महिन्यात एक सभा व्हावी. दलाली ठराव मोहीम सुरू करावी. भरारी पथकांद्वारे वजन मापे व ग्राहक फसवणुकीबाबत तपासणी करावी.
ग्राहक संरक्षणाविषयी काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांना पुरस्कार द्यावेत. अनेक व्यक्ती याबाबतची प्रदर्शने भरवून जास्तीत जास्त प्रचारप्रसिद्धी करावी, ग्राहक जागरूकता करावी, असे मिशन असून त्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे, असेही गवळी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, ग्राहक मंचाचे आनंद सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्राहक मंच इमारतीवर जंगली झुडपे
सिंधुदुर्गनगरी येथील ग्राहक संरक्षण इमारत वापराविना असून ग्राहक मंच इमारतीवर जंगली झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ३० लाख रूपये खर्च केले असून इमारतीला ८ लाख रूपयांच्या निधीची कमतरता होती. निधी अपुरा असल्यामुळे ही इमारत झाडाझुडपांनी वेढून गेली आहे. या इमारतीचा वापर लमाणी कामगार राहण्यासाठी करीत आहेत. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.