जबाबदारी ओळखून काम करा
By Admin | Updated: September 6, 2015 22:37 IST2015-09-06T22:37:25+5:302015-09-06T22:37:25+5:30
सुशांत खांडेकर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सक्त सूचना

जबाबदारी ओळखून काम करा
राजापूर : गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे व जनतेला चांगले सहकार्य करावे, अशी स्पष्ट सूचना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आयोजित बैठकीत दिली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रांत कार्यालयात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, लांजाचे तहसीलदार कांबळे, राजापूर व लांजाचे मुख्याधिकारी, दोन्ही तालुक्यांचे पोलीस निरीक्षक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.गणेशोत्सव काळात राजापूर शहरातील मार्गावरील विद्युत व्यवस्था सुरळीत राहील, याची खबरदारी घ्या, अशी सूचना नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. तसेच गणेश विसर्जन घाटासहीत तालुक्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या गणपती विसर्जन घाटाच्या स्वच्छतेसह त्या ठिकाणी कायमस्वरुपी सौरऊर्जेचे दिवे असावेत, अशीही सूचना संबंधितांना देण्यात आली.राजापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे ठरणारे विद्युत पोल हटवले जावेत, यासहत उत्सवाच्या काळात वीजपुरवठा कायम सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्या, अशी सूचना विद्युत वितरण विभागाला देण्यात आली. त्यासाठी तुमच्या कार्यालयात २४ तास फोनवर उपलब्ध होईल, असा कर्मचारी तैनात ठेवा, असेही बजावण्यात आले आहे. केवळ महावितरणच नाही तर प्रत्येक कार्यालय सणाच्या काळात २४ तास उघडे असायलाच हवे, अशा स्पष्ट शब्दात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावले.महामार्गावर वाटूळ, लांजा, ओणी, राजापूर या दरम्यान चेकपोस्ट उभारली जाणार आहेत. एमएच-०७ व एमएच-०८ या क्रमांकाच्या गाड्या वगळून परजिल्ह्यातून येणाऱ्या अन्य क्रमांकाच्या गाड्यांना दररोज रात्री १२ वाजल्यानंतर या चेकपोस्टवर थांबवले जाईल. त्यांना चहापाणी देऊन त्यांचा पुढील प्रवास कसा सुखकारक ठरेल, यादृष्टीने लक्ष दिले जाणार आहे. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या चेकपोस्टजवळ एक रूग्णवाहिकादेखील तैनात ठेवली जाईल. त्यादृष्टीने आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लांजा तालुक्यातील आडवली, विलवडे व राजापूर तालुक्यातील राजापूर रोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची आपापल्या गावी जाण्यासाठी खासगी वाहनांकडून होणाऱ्या लुटीचा मुद्दा या बैठकीत आला. त्यावेळी राजापूर आगाराने या रेल्वे स्थानकाकडे जादा फेऱ्या सोडून प्रवाशांची व्यवस्था करावी, अशा सूचना राजापूर आगाराला देण्यात आली. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या चालकांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसतो. त्यामुळे वाहने चालवताना त्यांना अडथळे ठरु नयेत किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा चालकांचे समुपदेशन करा, असेही प्रांताधिकाऱ्यांनी एस. टी. आगाराला बजावले.
गणेशोत्सव काळात प्रत्येक कार्यालयाने आपापली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे स्पष्ट शब्दात प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बजावले. (प्रतिनिधी)
तालुक्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेतली.