रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना : पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST2021-04-03T04:22:04+5:302021-04-03T04:22:04+5:30
कोल्हापूर : रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या ...

रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना : पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू
कोल्हापूर : रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहिरीच्या पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते.
शिंगणापूर (ता.करवीर) येथील यशराज राजू माळी (वय १६ ) याचा गावातील खाणीत बुडून मृत्यू झाला. माळी कुटुंबीय मूळचे सातारा जिल्ह्यातील आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून त्याला लहानाचा मोठा केला. सध्या तो दहावीत शिकत होता. सकाळी उठून मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला. त्याला पोहायला येत नव्हते. खाणीत उडी मारल्यावर ताे कडेला पडल्याने तो गाळात रुतला व त्याकडे कुणाचे लक्ष न गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
कोडोली (ता. पन्हाळा) येथील दोघे मुले विहिरीत बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ ) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ रा. दोघेही कोडोली ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पाच-सहा मित्रांसोबत अकराच्या सुमारास ती वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेली होती. कपडे विहिरीच्या काठावर काढून ते कठड्यावरच बसले होते. परंतु त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. या दोघांनाही पोहता येत नव्हते. हे दोघे बुडाल्याचे पाहून अन्य शुभम पाथरवटचा भाऊ भीतीने ओरडत गावात पळत आला. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली परंतु दुपारपर्यंत ती मिळून आली नव्हती. अजूनही त्यांची शोध मोहीम सुरु आहे. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडील शेतकरी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. शुभमची आई शिलाई मशिन चालवत त्याचे संगोपन करत होती. सामान्य गरीब कुटुंबातील या दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली.