कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST2021-05-22T04:23:43+5:302021-05-22T04:23:43+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने ...

Ran to Kolhapur for light in Konkan | कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अंधारात चाचपडत आहे. ‘ महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करणे अशक्य असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’चे कर्मचारी तिकडे मदतीसाठी धावले आहेत. कोल्हापुरातील २५० कर्मचारी तिथे असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के वीजपुरवठा सुरू करण्यात ‘महावितरण’ला यश आले आहे.

‘तौक्ते’ वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडे, घरे उद्‌ध्वस्त झालीच त्याचबरोबर ‘महावितरण’चे विद्युत खांब उखडून पडले आहेत. डीपी जमीनदोस्त झाल्या आहेत, विद्युत वाहिन्या तुटून कुठे जाऊन पडल्यात त्या सापडतही नाहीत. त्यामुळे गेली सहा दिवस कोकण अंधारात चाचपडत आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे, अशा परिस्थितीत कोकणवासीय जीवन जगत आहेत. विद्युत खांब, डीपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली की ‘महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हे सगळे उभे करणे अवघड होते. त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना कोकणात पाठविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३० अभियंते व २२० कर्मचारी असे २५० कर्मचारी गेली चार दिवसांपासून दिवस-रात्र काम करत आहेत. सुरुवातीच्या टप्यात ३३ केव्हीच्या लाईन जोडणी पूर्ण केली. त्यानंतर ११ केव्हीच्या उपवाहिन्या सुरू करून घरगुती वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी ठिकाण दाखवल्यानंतर कोल्हापूर, सांगलीचे कर्मचारी काम पूर्ण करूनच पुढे सरकत आहेत. कोकणातील परिस्थती पूर्ववत होण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.

चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा

गेली पाच-सहा दिवस सगळीकडे अंधार आहे, घरातील दळप-कांडप संपले आहे. वीज कधी येणार हे माहिती नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा कोकणवासीय करत आहेत.

कोट-

वादळाने ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणाच उद्‌ध्वस्त केली. ती पूर्ववत करण्यासाठी आमच्याकडील यंत्रणा अपुरी पडत होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी खूप साथ दिली. आमच्या कर्मचाऱ्यांसोबत ते वेगाने काम करत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- बी. टी. मोहिते (कार्यकारी अभियंता, कणकवली)

Web Title: Ran to Kolhapur for light in Konkan