राखी न विसरणारा भैय्या--

By Admin | Updated: August 28, 2015 23:47 IST2015-08-28T23:47:00+5:302015-08-28T23:47:00+5:30

रक्षाबंधन विशेष

Rakhi, who has not forgotten brother- | राखी न विसरणारा भैय्या--

राखी न विसरणारा भैय्या--

रत्नागिरी : ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना...’ या काव्य पंक्तीतून बहीण भावाकडे आर्जव करते. बहीण भावाच्या नात्याची विण राखीव्दारे घट्ट बांधून ठेवण्याचा सण अर्थात्च रक्षाबंधन! गेली २२ वर्षे हा सण आंबेडबुद्रुक येथील हसीना ऊर्फ फईमा निसार केळकर साजरा करीत आहेत. त्यांचे बंधुराज खलील युसूफ बावडेकर दरवर्षी न चुकता रक्षाबंधनाला हजर असतात, हे विशेष.
आंबेडखुर्द गावातील खलील युसूफ बावडेकर हे दुबईमध्ये नोकरी करीत होते. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांतच खलील मानसिक आजारी पडले. तेव्हापासून आतापर्यंत अनेक औषधोपचार करूनसुध्दा खलील बरे झाले नाहीत. परिणामी नोकरी सुटली. खलील यांना सहा बहिणींपैकी त्यांचे हसीनावर भरपूर प्रेम. त्यामुळे हसीनाकडे दरवर्षी ते न चुकता हजर असतात. खलील मानसिक आजारी असल्यामुळे ते आपल्या घरी केव्हा थांबतच नाहीत. त्यांच्या बंधुराजांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करूनसुध्दा ते सतत पायी फिरत असतात. वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाकडे काही मागत नाहीत किंवा कोणाकडून काही घेत नाहीत. जेवणाच्या वेळी भूक असेल तर कुणी वाढलेले ते जेवतात. पंचक्रोशीमध्ये खलील यांना ओळखणारी मंडळी खूप आहे. ही व्यक्ती सतत चालत फिरत असल्यामुळे ओळखीची मंडळी त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात. नातेवाईकही गाडीत बोलावतात. परंतु, ते स्पष्ट नकार देऊन चालतच फिरतात. त्यांच्याकडून कोणालाही उपद्रव होत नसल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनाही त्यांच्याबद्दल आस्था वाटते. खलील सतत फिरतच असल्यामुळे चिपळूण, माखजन, इतकेच नव्हे; तर ते मुंबईतही पोहोचले होते. शेवटी नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना गावी आणले. मानसिक आजारामुळे खलील यांची अशी स्थिती आहे. त्यांना दररोजचा वार किंवा दिनांक याबद्दल काहीच माहीत नाही. इतकेच नव्हे; तर जवळच्या मंडळींनाही ते ओळखत नाहीत. परंतु, काळवेळेचे भान नसलेले खलिल रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र बहिणीकडे न चुकता येतात. इतकेच नव्हे; तर बहिणीच्या सासू सासऱ्यांसह भाच्याची चौकशी करतात. बहिणीकडून राखी बांधून घेतात. वाढलेले जेवतात व पुन्हा आलेल्या मार्गाने निघून जातात.
आपल्या बंधूराजाच्या या परिस्थितीमुळे हसीना व्याकूळ होतात. खलील घरी आलेवर परत जाऊ नयेत यासाठी त्यांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले होते. त्यांना घरातील एका खोलीत राहण्यासाठी विनंती केली परंतु, खलील ते न जुमानता निघून गेले. गेली २२ वर्षे हसीना त्यांच्यासाठी नवीन कपडे घेतात, त्यांची वाट पहात असतात.
कुठल्याच ऋतूंचा खलील यांच्यावर दिनक्रमावर परिणाम होत नाही. त्यांची फिरस्ती सतत सुरू असते. परंतु, रक्षाबंधन मात्र कधीच चुकत नाही. थोड्या वेळासाठी का होईना भाऊ घरी येतो, आपला भाऊ घरीच थांबावा, त्याचेवर आणखी औषधोउपचार व्हावेत व तो बरा व्हावा अशी ईच्छा हसीना व त्यांच्या सर्व बहिणींची आहे मात्र ती असफल ठरत आहे. त्यामुळेच ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ ऐवजी हसीना फक्त आपल्या भावासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात.

Web Title: Rakhi, who has not forgotten brother-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.