राजू शेट्टी कारखानदारांना फितूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:15+5:302021-09-23T04:26:15+5:30
* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी ...

राजू शेट्टी कारखानदारांना फितूर
* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र
जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याला लिहून दिले आहे, असा आरोप आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने पत्रकार बैठकीत केला. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेट्टी हे साखर कारखानदारांना फितूर झाले आहेत, असादेखील आरोप संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केला.
उसाच्या थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज मिळावे, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून लढा सुरू आहे. आरआरसीअंतर्गत साखर आयुक्तांकडून कारखानदारांवर जप्तीची कारवाई होणार होती. मात्र, माजी खासदार शेट्टी यांच्यासह सावकर मादनाईक, पं.स. सदस्य सचिन शिंदे, अण्णासाहेब चौगुले, राजश्री गावडे या शेतकरी संघटनेच्या सभासद शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्रच संबंधित कारखान्याला लिहून दिले आहे, असे पुराव्यानिशी सांगून चुडमुंगे म्हणाले, साखर कारखानदारांशी संगनमत करून शेट्टी हे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड हेदेखील कारखानदारांच्या बाजूने आहेत. ७३०० ऊस उत्पादक सभासदांनी एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्र लिहून दिल्याने साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई रद्द केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु १५ टक्के व्याजासाठी आमचा लढा सुरू राहणार असून, याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चुडमुंगे यांनी सांगितले.