राजारामपुरीत 'अडथळ्यांची शर्यत'
By Admin | Updated: January 10, 2015 00:21 IST2015-01-09T23:19:50+5:302015-01-10T00:21:39+5:30
रस्त्यांच्या कामाने नागरिक हैराण : वाहतूक बदल, एकेरी मार्गाने प्रभागात सापसिडीचा खेळ, विरंगुळ्याच्या ठिकाणाची मागणी

राजारामपुरीत 'अडथळ्यांची शर्यत'
कोल्हापूर : उच्चभ्रू रहिवासी परिसर, व्यापारपेठ दुसरीकडे अनुसूचित जाती-जमातीतील सर्वसामान्यांची लोकवस्ती असे प्रभागाचे स्वरूप आहे. एकाचवेळी या दोन्ही वर्गांतील नागरिकांच्या पायाभूत गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान राजारामपुरी प्रभागाच्या नगरसेवकावर असते. सध्या येथील रस्त्यांचे काम मार्गी लागत आहे; पण रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्थ असून वाहतूक मार्गामुळे अनेक ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे. त्याचा परिणाम येथील व्यवसायांवर होत आहे. खाऊ गल्लीतील स्वच्छता, राजाराम गार्डन आणि जगदाळे हॉलचे नूतनीकरण ही कामे रखडलेली आहे.
राजाराम महाराजांनी वसवलेल्या राजारामपुरी या आखीव रेखीव वसाहतीत बहुतांशी प्रमाणात उच्च मध्यमवर्गीय लोक राहतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत या परिसराचे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. साधारणपणे पाच हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागाची राजाराम गार्डन ते सिटी हॉस्पिटल, लकी बाजारसमोरील बाजू, मातंग समाज, शाहू मिल, बागल चौक अशी रचना आहे. १९९० मध्ये या प्रभागातून शिवाजीराव कवाळे बहुमताने निवडून आले होते. तेव्हापासून म्हणजे गेली २० वर्षे कवाळे कुटुंब या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९९५ मध्ये कांचन कवाळे या प्रभागातून निवडून आल्या. त्यांनी एकदा महापौरपदही भूषविले आहे.
या प्रभागात रस्त्यांचा मोठा प्रश्न होता, जो बऱ्याच अंशी निकालात निघाला असला तरी काही अंतर्गत रस्ते होणे बाकी आहे. मुख्य रस्त्याचे काम आता नगरोत्थान अंतर्गत सुरू झाले आहे. शाहूपुरी, शिवाजी पेठ याप्रमाणे शहराचे एक मध्यवर्ती आणि प्रमुख ठिकाण असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, या परिसरातील रहिवाशांना विरंगुळ््याचे ठिकाण नाही. राजाराम गार्डनची दुरवस्था झाली आहे. आसपासच्या गटारींचे पाणी येथे जमा होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही असते. गार्डन म्हणून मोजकी झाडे शिल्लक आहेत. लागूनच जनता बझारच्या शेजारील खाऊ गल्लीत प्रचंड अस्वच्छता असते. पावसाळ्यात तर वरून आलेले सगळे पाणी या खाऊ गल्लीत साचत असल्याने त्यावेळी त्याची भयानकता अधिक जाणवते.
या परिसरातील नागरिकांना घरचे काही कार्य करायचे म्हटले, तर हॉल नाही. एखादा बहुद्देशीय हॉल असणे ही येथील मुख्य गरज आहे. जगदाळे हॉलच्या नूतनीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना कवाळे यांना यश आलेले नाही. प्रभागातील लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने येत्या काही वर्षात पिण्याच्या पाण्याची मोठी लाईन, मोठ्या पाईपलाईनचे ड्रेनेज या सगळ्या सोयी-सुविधा पुरवण्याचे आव्हान आहे.
प्रभागातील रस्ते, ड्रेनेजची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या पाच वर्षांत मिळालेल्या ८०-९० लाखांच्या निधीतून प्रभागातील विकासकामे करण्यात आली आहेत. सातत्याने येथे लोकवस्ती वाढत असल्याने त्याप्रमाणात सोयी-सुविधाही निर्माण करण्यासाठी माझे प्राधान्य आहे.
- कांचन कवाळे (नगरसेविका)
प्रमुख समस्या
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
खादकामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे
गार्डन, सांस्कृतिक हॉलची प्रभागात वाणवा
मोठी पाणीपुरवठा लाईन
ड्रेनेजलाईनची गरज
विकासकामांचा दावा
रघुनाथ चौक मित्रमंडळ येथील रस्त्याचे डांबरीकरण
ब्लॅक बेरी दुकान ते घाटगे-पाटील सन्स येथील रस्ता
प्रभागातील गल्ल्यांमधील रस्ते व पॅचवर्क
१६ लाख रुपये स्वच्छतागृहांवर खर्च
गटर्स, जिम्नॅशियम हॉलचे काम
विकासकामांचा दावा
रघुनाथ चौक मित्रमंडळ येथील रस्त्याचे डांबरीकरण
ब्लॅक बेरी दुकान ते घाटगे-पाटील सन्स येथील रस्ता
प्रभागातील गल्ल्यांमधील रस्ते व पॅचवर्क
१६ लाख रुपये स्वच्छतागृहांवर खर्च
गटर्स, जिम्नॅशियम हॉलचे काम
प्रभाग क्र. ४२ (राजारामपुरी )