जिल्ह्यात अवकाळी पाऊस
By Admin | Updated: November 15, 2014 00:15 IST2014-11-15T00:09:00+5:302014-11-15T00:15:17+5:30
शेतकऱ्यांची तारांबळ : भुदरगडमध्ये दहा मिली मीटर पावसाची नोंद, ऊस तोडणीचा खोळंबा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त असला, तरी हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊसतोड आणि वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता आठवड्यासाठी लांबण्याची भीती व्यक्त होत आहे.
इचलकरंजीत रिपरिप
इचलकरंजी : अवकाळी पावसाने आज, शुक्रवारी पहाटेपासूनच हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे शहरातील आजचा बाजार, फेरीवाले तसेच बालदिनानिमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांवर थोड्या फार प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण झाला, तर परिसरातील ग्रामीण भागात ऊसतोडणी मजुरांची दयनीय अवस्था झाली.
आज पहाटे पाच वाजल्यापासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. इचलकरंजीत आज कामगारांच्या पगाराचा व आठवडी बाजाराचा मुख्य दिवस. सकाळपासून विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, फेरीवाले यांची चांगलीच धांदल उडाली. विकली मार्केट परिसरातही पाणी साचल्यामुळे बाजारकरूंना चिखलातून मार्ग काढत बाजार करावा लागला. कलानगर-चंदूर मार्गावर गटारीतील रस्त्याकडेला काढून ठेवलेला कचरा पावसामुळे रस्त्यावर पसरून दुर्गंधी पसरली होती, तर शहराच्या सखल भागातील हत्ती चौक, कागवाडे मळा, विकली मार्केट या परिसरात पाणी साचले होते. दुपारनंतर पावसाने थोडी फार उघडीप दिली असली, तरी दिवसभर वातावरण ढगाळ होते व हवेत गारवा निर्माण झाला होता.
परिसरातील ग्रामीण भागात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या रस्त्यालगतच्या शेतात उभारलेल्या खोपट्यांमध्ये पावसाचे पाणी आल्यामुळे संसाराचा गाडा विस्कळीत झाला. सोबत आणलेले धान्य, कपडे व अन्य साहित्य अन्यत्र सुरक्षित जागी हलवावे लागले. तसेच ऊस शेतीमध्ये पाणी राहिल्यामुळे रस्त्यालगतचीच ऊसतोड करावी लागत आहे.
गडहिंग्लजला झोडपले
गडहिंग्लज : ऐन हिवाळ्यात व ऊसतोडणी हंगामात पुन्हा एकदा पावसाने गडहिंग्लज शहर व तालुक्यात हजेरी लावली आहे. गुरुवारी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. आज दुसऱ्या दिवशीही पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.
यावर्षी ऊसतोडणी लवकर सुरू झाली असून, गत आठ दिवसांपासून सुरू झालेली ऊसतोडणी, तर अंतिम टप्प्यात असलेली भात कापणी पावसामुळे खोळंबली आहे. मात्र, ज्वारी, हरभरा, लसूण, कांदा, मिरची, ऊस, तंबाखू, आदी पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
आजऱ्यात धुवाधार पाऊस
आजरा : आजरा शहरासह तालुक्यात काल, गुरुवापासून धुवाधार पाऊस सुरू असून, पावसामुळे सुगीत अडकलेला बळिराजा अडचणीत आला आहे. ऊसतोड व वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने कारखाना गळीत आठवड्याकरिता लांबण्याची शक्यता आहे.
आठवडा बाजारातही पावसामुळे मंदीचे वातावरण होते. अचानक झालेल्या हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कारखाना गळीत सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच पाऊस सुरू झाल्याने तोडणी व वाहतूक यंत्रणा चालणे अवघड झाले आहे.
भुदरगडमध्ये ऊसतोड ठप्प
गारगोटी : भुदरगड तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, आज, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत दहा मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
काल सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. रात्री तुरळक, तर आज संपूर्ण दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला होता. पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली, तर काही ठिकाणी गुऱ्हाळघर व कारखान्यासाठी सुरू असणारी तोड बंद पडली. ऊस तोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या तोडणी कामगारांची कुटुंबे आसरा शोधत होती. यामुळे शाळू टाकणे, भुईमूग काढणी, अशा कामांत शेतकऱ्यांना आता वेळ लागणार आहे.
चिकोत्रा खोऱ्यात कामांचा खोळंबा
पांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते; मात्र काल रात्री हलक्याशा पावसाच्या सरी पडल्या व सकाळी जोरदार पाऊस पडला. हा पाऊस ऊस व रब्बी पिकास पोषक ठरला आहे, तर भुईमूग काढणीस अडथळा ठरला आहे. उर्वरित भात कापणी व मळणी खोळंबली आहे.
नवे पारगाव परिसर गारठला
नवे पारगाव : दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज, शुक्रवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने हातकणंगले तालुक्यातील पारगाव परिसर गारठून गेला आहे. हातकणंगले तालुक्यातील पश्चिम विभागातील नीलेवाडी, पारगाव, पाडळी, अंबप, वाठार, अंबपवाडी, तळसंदे, चावरे, आदी परिसरात गेले पंधरा दिवस
सर्दी-खोकल्याची साथ सुरू आहे.
कोडोली भाताचे नुकसान
कोडोली : कोडोली व परिसरात आज, शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या परिसरात साखर कारखान्यांच्या ऊसतोडी सुरू झाल्या आहेत; परंतु पावसाची ओढ चांगलीच असल्याने ऊसतोडणी तसेच, उसाच्या फडातून वाहने बाहेर काढणे चांगलेच अवघड झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, ऊसतोडी थांबविण्यात आल्यामुळे शेतकरी व ऊसतोड कामगारही अडचणीत आले आहेत. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (प्रतिनिधी)