द्राक्षबागांच्या मुळावर पाऊस
By Admin | Updated: December 12, 2014 23:32 IST2014-12-12T22:57:35+5:302014-12-12T23:32:53+5:30
दावण्याचा प्रादुर्भाव : जिल्ह्यात २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

द्राक्षबागांच्या मुळावर पाऊस
सांगली : लक्षद्वीप ते नैऋत्य मध्य प्रदेश व उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह सांगली जिल्ह्यातील शिराळा, खानापूर, आटपाडी, मिरज तालुक्यांत आज, शुक्रवारी पाऊस झाला. येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. बागांवर दावण्याचा प्रादुर्भाव होत असून, तयार द्राक्षांमध्ये नत्राचे प्रमाण वाढून मणी तडकण्याची शक्यता आहे.
वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर आटपाडी तालुक्यांतील काही भागामध्ये आज, शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. शिराळा तालुक्यातील पुनवत परिसरात आणि मिरज तालुक्यातील बुधगाव, माधवनगर परिसरात सकाळी, तर लिंगनूर, बेडग, सोनी परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. विटा शहरासह खानापूर तालुक्यातील वेजेगाव, साळशिंगे, परिसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह पाऊस झाला. हा पाऊस रब्बीसाठी फायद्याचा असला, तरी द्राक्ष पिकासाठी हानिकारक आहे. कार्वे, बामणी, पारे परिसरातही तुरळक पाऊस झाला. खानापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पूर्वभागातील निर्यातक्षम बागायतदार हादरला आहे.
तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात ढगाळ हवामान होते. सध्या मिरज, तासगाव तालुक्यातील दहा ते पंधरा टक्के द्राक्षबागांमधील काळी द्राक्षे तयार झाली असून, त्यांची बाजारपेठेत विक्री सुरू आहे.
काही द्राक्षे येत्या पंधरा दिवसांत विक्रीसाठी येणार असल्याचे द्राक्ष बागायतदार नामदेव पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
द्राक्षांच्या मणी तडकले
पावसामुळे द्राक्षांच्या मण्यांमध्ये नत्र तयार होऊन मणी तडकले जात आहेत. यातून शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. उर्वरित ८५ टक्के द्राक्षबागांतील मणी महिन्याभरात तयार होण्याची शक्यता असून, अवकाळी पावसामुळे दावण्या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाने येत्या
२४ तासांमध्ये जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली असून,
४८ तास ढगाळ हवामान
राहणार असल्याचे सांगितले आहे. या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांनी औषध फवारणी सुरू केली आहे.