रेल्वेस ६० टक्के, ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ला शंभर टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:27+5:302021-09-11T04:24:27+5:30
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्हे निर्बंधमुक्तीकडे झेपावले असून रेल्वेची चाकेही गतिमान होऊ लागली आहेत. बहुतांशी ठिकाणी रेल्वेची वाहतूक सुरळीत ...

रेल्वेस ६० टक्के, ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ला शंभर टक्के प्रतिसाद
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्हे निर्बंधमुक्तीकडे झेपावले असून रेल्वेची चाकेही गतिमान होऊ लागली आहेत. बहुतांशी ठिकाणी रेल्वेची वाहतूक सुरळीत होत आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सरासरी ६० टक्के आरक्षणास प्रतिसाद मिळू लागला आहे. तर नागपूर, गोंदियाकडे दुपारी ३.३० वाजता जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल होऊ लागले आहे.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधून कोरोनाच्या सलग दोन लाटांनतर केवळ आठ रेल्वे सुरु आहेत. यात कोल्हापूर- मुंबई (कोयना एक्सप्रेस),कोल्हापूर - अहमदाबाद, कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन), कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया), कोल्हापूर - गोंदिया, कोल्हापूर (महाराष्ट्र एक्सप्रेस),कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी), कोल्हापूर - धनबाद यांचा समावेश आहे. याच एक्सप्रेसना स्पेशल ट्रेन सुरु आहेत. तर अन्य आठ एक्सप्रेसना अजूनही कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे केवळ आठ रेल्वेगाड्या सुरू आहेत.
एसी ला आरक्षण होऊ लागले
कोरोनाच्या सलग दोन लाटांनंतर कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-नागपूर-गोंदीया, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-निजामुद्दीन या रेल्वे गाड्यांमधील एसी कोचेसचेही आरक्षण होऊ लागले आहे.
पॅसेंजर कधी सुरु होणार ?
गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सातारा, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सोलापूर, या महत्त्वाच्या पॅसेंजर अद्यापही बंद आहेत. याबाबतची विचारणा रेल्वेच्या सूत्रांकडे केल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अद्यापही सुरु करण्यासंबधी कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे या रेल्वेबाबत सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर घेतले जात असल्याने काहीच सांगता येत नसल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
सर्वाधिक वेटिंग महाराष्ट्र एक्सप्रेसला
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधून नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. या रेल्वेचे शंभर टक्के आरक्षण फुल्ल होऊ लागले आहे. त्यामुळे या रेल्वेला केवळ वेटिंग सुरु आहे. विशेषत : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एकमेव कोल्हापूर-मुंबई स्पेशल ट्रेनसाठी सध्या तरी ६५ टक्के आरक्षण हाेत आहे.
कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर-धनबाद मार्गावर प्रवासीसंख्या कमी
कोल्हापूरहून दिल्लीला (निजामुद्दीन) जाण्यासाठी कोल्हापूर-दिल्ली ही विशेष रेल्वे सुरु आहे. या रेल्वेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. जेमतेम ५० टक्केपर्यंतचे आरक्षण कोल्हापुरातून मिळत आहे. कोरोनाकाळात परप्रांतीय मजुरांचा आधार असणारी कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसला थंडा प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्गानंतर या रेल्वेला कमी प्रतिसाद मिळू लागला आहे. जसजसी पुढे जाईल त्याप्रमाणे काही प्रमाणात प्रवासी संख्या मिळत आहे.
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
कोल्हापूर - मुंबई (कोयना एक्सप्रेस),
कोल्हापूर - अहमदाबाद,
कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन)
कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया)
कोल्हापूर (महाराष्ट्र एक्सप्रेस)
कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी)
कोल्हापूर - धनबाद
कोल्हापूर-गोंदीया
मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराज टर्मिनन्समधून मुंबईसह विविध ठिकाणी जाणारे प्रवाशी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसतात. विशेषत: लोहमार्ग पोलीस व केंद्रीय रेल्वे पोलीस याबाबत अजूनही सतर्क आहेत. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांची गय केली जात नाही.