विमानतळाच्या जागेचा प्रश्न मार्गी

By Admin | Updated: September 8, 2016 00:30 IST2016-09-08T00:05:30+5:302016-09-08T00:30:12+5:30

‘गडमुडशिंगी‘चा ठराव : १२८ खातेदारांना ११ कोटी मिळणार

The question of the issue of the airport's land | विमानतळाच्या जागेचा प्रश्न मार्गी

विमानतळाच्या जागेचा प्रश्न मार्गी

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या जमिनीसाठी केलेला ‘ना हरकत ठराव’ बुधवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सुपूर्द केल्याने कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील दुधगंगा डाव्या कालव्यातील १२८ खातेदारांना सुमारे ११ कोटी रुपये मिळणार असल्याने व यातील भू-भाडे सुमारे ८५ लाख रुपये या खातेदारांच्या खात्यावर जमा झाल्याने ग्रामस्थांनी हिरवा कंदील दाखविला आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीसाठी गडमुडशिंगी गावच्या हद्दीतील वनविभागाची २७ एकर जमीन मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू होता; परंतु ग्रामस्थांच्या काही मागण्यांमुळे हा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून भिजत पडला होता; परंतु काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ग्रामस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा होऊन मूळ मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर
भू-संपादनासाठी ‘ना हरकत ठराव’ देण्याचे मान्य केले होते.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर विमानतळसंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांच्यासह संजय पाटील, अरविंद मुडशिंगीकर, दत्तात्रय कुंभार, ग्रामविकास अधिकारी आर. एम. गाडवे, तलाठी किरण दराडे यांनी विमानतळाकरिता भू-संपादनासाठी ग्रामपंचायतीचा ‘ना हरकत ठराव’ विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला. त्यामुळे कोल्हापूर विमातळाच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात होऊन एकंदरीत विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावाशेजारील न्यू वाडदे या ग्रामपंचायतीला गाव विभाजनामध्ये मूळ गावातील सुमारे ७५० एकर महसूल क्षेत्र गेले आहे. त्या ग्रामपंचायतीच्या मानाने ते क्षेत्र जादा आहे. त्यामुळे यातील ५०० एकर क्षेत्र परत मिळावे व दुधगंगा डावा कालवा संपादनातील न मिळालेला मोबदला सध्याच्या दराने मिळावा, या प्रामुख्याने ग्रामस्थांच्या मागण्या होत्या. त्यानुसार शासनाकडून न्यू वाडदे ग्रामपंचायतसाठी दिलेल्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ५०० एकर क्षेत्र पुन्हा ग्रामपंचायतीला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुधगंगा डाव्या कालव्यासाठी जमीन संपादित केलेल्या १२८ खातेदारांना प्रतिगुंठा १ लाख ४ हजार रुपये याप्रमाणे ११ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच या खातेदारांच्या बँक खात्यावर भू-भाडे म्हणून सुमारे ८५ लाख रुपये जमा करण्यात आले.
शासनाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीने वनविभागाची जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी देण्याचा ठराव विभागीय आयुक्तांना दिल्याचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The question of the issue of the airport's land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.