माधवनगर कॉटन मिल कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: January 23, 2015 00:36 IST2015-01-23T00:30:17+5:302015-01-23T00:36:20+5:30
एकवीस वर्षांपूूर्वी मिल बंद : थकित देणी मिळवून देण्यासाठी जागृत कामगार पुनर्वसन समितीची स्थापना

माधवनगर कॉटन मिल कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
गजानन साळुंखे - माधवनगर -एकेकाळी कापड उद्योगासाठी संपूर्ण राज्यात नावलौकिक असणाऱ्या व सध्या ओसाड माळरान बनलेल्या माधवनगर येथील दि कॉटन मिल कामगारांच्या हक्कासाठी २१ वर्षांनी पुन्हा काही मूठभर कामगारांनी रणशिंग फुंकले आहे. दि माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली असून, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.
दि माधवनगर कॉटन मिल २९ सप्टेंबर १९९४ मध्ये विविध कारणांनी बंद पडली. मिल पुन्हा सुरू करण्याच्या आणाभाका घेत असंख्य राजकीय घोषणा झाल्या. अनेक आंदोलने झाली; पण राजकीय साठमारीत या मिलचा भोंगा काही पुन्हा वाजला नाही. मिलच्या बॉयलरबरोबरच कामगारांच्या चुलीही बंद पडल्या. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्यावर या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही बिकट परिस्थितीशी झुंजावे लागले. मिल बंद पडल्याने एक पिढी उद्ध्वस्त झाली. मिल बंद पडताना मिलमध्ये प्रत्यक्ष दोन हजार, तर कंत्राटी पद्धतीने पाचशेहून अधिक कामगार काम करत होते. याबरोबरच मिलवर अवलंबून विविध उद्योगधंदे होते. ही मिल सुरू व्हावी अथवा कामगारांची देणी मिळावीत, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृृत्वाखाली २००१ मध्ये जनआंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन रस्त्यावर सुरू होतेच, त्याचबरोबर न्यायालयीन पातळीवरही लढाई सुरू होती. या आंदोलनाच्या रेट्यामुळे कॉटन मिलच्या लिक्विडेशन प्रक्रियेला वेग आला आणि माधवनगर कॉटन मिलचा लिलाव झाला. यामुळे मिलवर असणाऱ्या काही बॅँकांची कर्जे, काही कामगारांची काहीप्रमाणात देणी मिळाली. काही प्रमाणात न्याय मिळाला, पण कामगारांचा प्रश्न पूर्णत: सुटला नाही. आजही अनेक कामगारांचे हक्काचे पैसे काही प्रमाणात येणे बाकी आहे. मिलच्या अनेक कामगारांचे निधन झाले आहे. त्यांचे वारस आजही वाट पहात आहेत. कामगारांची ग्रॅच्युईटीची २३ टक्के रक्कम काही कामगारांना मिळाली आहे, तर काही कामगारांना काहीच रक्कम मिळाली नाही.
मिलच्या लिलावानंतर किती बॅँकांची कर्जे भागवण्यात आली? किती कामगारांना पैसे मिळाले? कामगारांच्या चाळीच्या जागेचे काय झाले? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची माहिती कामगार, ग्रामस्थांना मिळत नाही. दि माधवनगर कॉटन मिलची सर्व प्रक्रिया मुुंबई येथील लिक्विडेटर कार्यालयातून चालते. तेथे सामान्य कामगार पोहोचू शकत नाही. यासाठी काही कामगारांनी पुढाकार घेतला असून, ‘दि. माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समिती’च्या माध्यमातून जनआंदोलन उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
यासाठी एक-दोन बैठकाही झाल्या असून, मार्गदर्शक म्हणून एसटी कामगार नेते बिराज साळुंखे, भारत सूतगिरणीचे सलभद्र पाटील, माजी उपसरपंच गोविंद परांजपे, दीपक कांबळे, निमंत्रक म्हणून शिवाजीराव पाटील, संभाजी यादव, उत्तम कांबळे, मोहन माने, भगवान दाजी पाटील ही कामगार मंडळी धडपडत आहेत. नव्या पुनर्वसन समितीमार्फत लिक्विडेटर न्यायालयात कामगारांसाठी दाद मागितली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा २१ वर्षांनी मिलप्रश्नी आंदोलन सुरू होणार, हे नक्की !
समितीकडे २५७ कामगारांची यादी
कॉटन मिलचा काही वर्षापूर्वी लिलाव झाला. त्यातून बॅँकांची देणी, काही प्रमाणात कामगारांची देणी भागविण्यात आली. मात्र अनेकांना पैसे मिळालेले नाहीत. सध्या माधवनगर कॉटन मिल जागृत कामगार पुनर्वसन समितीकडे २५७ कामगारांची यादी प्राप्त झाली असून, या कामगारांची थकबाकी, पैसे मिलकडून येणे आहेत. पण यादीव्यतिरिक्त असंख्य कामगार सध्या सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पसरले आहेत. ज्यांना अजून मिलकडून पैसे मिळाले नाहीत किंवा अपूर्ण रक्कम मिळाली आहे, अशा कामगारांचा शोध घेणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे या समितीपुढील मोठे लक्ष आहे.