रेखांकनाला बगल देत गुप्तपणे भूसंपादनाची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:26+5:302021-03-27T04:24:26+5:30
कोपार्डे: रत्नागिरी -नागपूर एन एच १६६ राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामस्थ शासकीय अधिकारी यांच्या संमतीने मंजूर झालेले ...

रेखांकनाला बगल देत गुप्तपणे भूसंपादनाची प्रक्रिया
कोपार्डे: रत्नागिरी -नागपूर एन एच १६६ राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामस्थ शासकीय अधिकारी यांच्या संमतीने मंजूर झालेले रेखांकनाला अधिकारी बगल देत भूसंपादनाची प्रक्रिया गुप्तपणे राबवत असल्याने शासनाचे व ग्रामस्थांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे भुये भुयेवाडी ग्रामस्थांतून असंतोष व्यक्त होत आहे.
रत्नागिरी-नागपूर १६६ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. करवीर तालुक्यातील भुये व भुयेवाडी गावातून हा राष्ट्रीय महामार्ग जातो. ३० जानेवारी २०१८ व १२ एप्रिल २०१८ या दिवशी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत प्रादेशिक योजनेच्या आराखड्यानुसार, ४५ मीटर आरक्षित असणाऱ्या रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन करण्याचा निर्णय झाला होता. या रेखांकनानुसार तिन्ही रस्ते एकत्र करण्याची मागणी भुये,भुयेवाडी गावातील शेतकऱ्यांनी केली होती. याला मान्यता म्हणून या गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन सदरचा चालू रस्ता क्रमांक राज्यमार्ग १९४ राष्ट्रीय महामार्गासाठी देण्याचे ठरले होते. तसा ठरावही केंद्रीय महामार्ग कार्यालयाला पाठवून त्यानुसार पीआययू कार्यालयाने राष्ट्रीय महामार्गचे रेखांकन करून तसा प्लॅन लोकप्रतिनिधी व संबंधित शेतकरी यांना दाखवून त्याची लेखी संमती घेतली आहे. सदर राज्यमार्ग १९४ चे रुंदीकरण करण्याचे रेखांकनही तयार झाले;
मात्र २०१९ नंतर या रेखांकनात बदल करण्यात आला आहे. एका रस्त्यावर राज्य व राष्ट्रीय महामार्गाची होणारी सोय डावलून पुन्हा त्याला समांतर रत्नागिरी नागपूर एन एच १६६ साठी २०० फुटाने भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे शासनाला भूसंपादनासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. लाख मोलाची जमीन शेतकऱ्यांना गमवावी लागणार आहे. भुयेवाडी येथील नवीन बांधकाम केलेले २० बंगले, जुनी १० घरे, पाच विहिरी, बोअरवेल तसेच प्रामुख्याने बागायती शेतीचे रेखांकनात बदल झाल्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनानुसारच रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करावे यासाठी पालकमंत्री, स्थानिक आमदार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
चौकट १)हरकती घेतल्या; पण सुनावणी नाही : या रस्त्यासाठी भुये व भुयेवाडी ग्रामस्थांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात ग्रामस्थांनी शंभर टक्के हरकती विरोध केल्याने संबंधित विभागाने सुनावणी घेतली नाही. सुनावणी न घेता सध्या भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ग्रामस्थांत असंतोष आणि विरोध निर्माण झाला आहे २) राज्य व राष्ट्रीय महामार्गातील अंतर केवळ १०० फुटाचे आहे. राज्य मार्ग १९४ ची रुंदी १४२ फूट तर एन एच १६६ ची २०० फूट अशी दोन रस्त्यासाठी साडे तीनशे फूट रुंदीने जमीन जाणार आहे, याऐवजी राजमार्ग १९४ चे रुंदीकरण २०० फुटाने केल्यास अनेक स्थावर मालमत्ता व शेती वाचवता येऊ शकते.
कोट :
केंद्र व राज्य वादात शासकीय अधिकाऱ्यांनी सार्वमताने मंजूर करण्यात आलेले रेखांकन बदलले आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन व स्थावर मालमत्तेचे नुकसान करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. यासाठी पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी लक्ष घालून पूर्वीच्या रेखांकनाप्रमाणे राज्यमार्गावरूनच राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन मंजूर करावे. राजेंद्र ऊर्फ देव पाटील (भुयेवाडी ग्रामस्थ)
फोटो : २६ भुयेवाडी रेखांकन
भुयेवाडी व भुये दरम्यान केवळ दीड किलोमीटरसाठी दोन रस्ते रेखांकित करण्यात आले आहेत.