आजपासून खासगी आराम बस वाहतूक पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:03+5:302021-05-24T04:24:03+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम ...

आजपासून खासगी आराम बस वाहतूक पूर्ववत
कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम बससेवा पूर्ववत होणार आहे. प्रवाशांना ॲंटिजन अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध व्यवसायांवर निर्बंध आणले आहेत. त्यात एस.टी.ची बससेवाही बंद केली आहे. मात्र, प्रवाशांची सोय व्हावी याकरिता खासगी आराम बसेसना अटी-शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार ५० टक्के आसन क्षमता, संपूर्ण बस सॅनिटाईझ करून घेणे, प्रत्येक प्रवाशाची ॲंटिजन चाचणी, थर्मल चाचणी आवश्यक केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जेथे प्रवासी उतरणार आहेत, तेथे एकच थांबा करावा. येणाऱ्या प्रवाशांची ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून बस पुढे जाऊ द्यावी. कोल्हापूर, इचलकरंजी शहर, शाहूवाडी, गडहिंग्लज येथील बस वाहतूक संघटनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सर्व नियमांची अंमलबजावणी होती की नाही याची जबाबदारी या प्रतिनिधीवर राहणार आहे. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नांदेड, नागपूर, बेंगलोर, हैदराबाद आदी मार्गावर बसेस ये-जा करणार आहेत. याकरिता सर्व चाचण्या करून त्याचे अहवाल प्रवाशांनी आधीच तयार करून घ्यावेत. त्यामुळे वेळेची बचत होईल. खासगी आराम बसेसना ई-पास आवश्यक नाही. तरीसुद्धा त्याची मागणी प्रशासनाकडून केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे दाद मागण्यात आली आहे. तरी या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केले आहे.